

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० विश्वचषकातील 'करो या मरो'च्या लढतीपूर्वी क्रिकेट विश्वात प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्याचा निकाल काय लागणार, यावर जगभरातील तज्ज्ञ आपली मते मांडत आहेत. मात्र, पाकिस्तानातील एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये या विषयावरून चक्क राडा झाला. माजी क्रिकेटपटू अहमद शहजाद आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर यांच्यात भारतीय संघाच्या गुणवत्तेवरून शाब्दिक युद्ध रंगले. अहमद शहजादने टीम इंडियाच्या विजयावर इतका ठाम विश्वास व्यक्त केला की, भारत हरल्यास कायमचा शो सोडण्याची घोषणा त्याने केली आहे.
'हारना मना है' या प्रसिद्ध टॉक शोमध्ये बोलताना अहमद शहजादने भारतीय संघाची पाठराखण केली. तो म्हणाला, "भारतीय खेळाडू एका उत्कृष्ट सिस्टीममधून तयार होऊन येतात. त्यांना मोठ्या सामन्यातील दडपण कसे हाताळायचे हे नीट ठाऊक आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी हे सिद्ध केले आहे. जिम्बाब्वेविरुद्ध देखील त्यांनी २५० हून अधिक धावा कुटून आपली ताकद दाखवून दिली. अशा दबावाच्या वेळी मोठ्या टीम १५० वर बाद होतात, पण भारत तसा नाही. जर आज भारत हरला, तर मी हा शो सोडून देईन आणि पुन्हा कधीही इथे येणार नाही."
दुसरीकडे, मोहम्मद आमीरने शहजादचे मुद्दे खोडून काढत वेस्ट इंडिजच्या विजयाची भविष्यवाणी केली. आमीरच्या मते, कोलकात्याच्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजी कमकुवत ठरू शकते.
तो म्हणाला, "जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता भारताची गोलंदाजी फारशी प्रभावी वाटत नाही. जिम्बाब्वेसारख्या संघानेही त्यांच्याविरुद्ध १८४ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडे खालच्या फळीतही जबरदस्त फलंदाज आहेत, ज्यांनी ९० धावांवर ६ गडी बाद असतानाही १८० पर्यंत मजल मारली होती. मला वाटते वेस्ट इंडिज भारताला सहज पराभूत करेल."
कोलकाता येथे होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआउटसारखा आहे. जो संघ जिंकेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. भारताची फलंदाजी आणि वेस्ट इंडिजची 'पॉवर हिटिंग' यांच्यातील ही लढत चुरशीची होणार आहे. आमीर आणि शहजाद यांच्यातील ही वादावादी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, आता सर्वांचे लक्ष या सामन्याच्या निकालाकडे आणि त्यानंतर शहजादच्या भूमिकेकडे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.