India vs West Indies Women: भारतीय महिलांचा वेस्टइंडीजला धोबीपछाड; फायनलमध्ये द. आफ्रिकेचे आव्हान

भारतीय महिलांनी वेस्टइंडीजला पराभूत करत तिरंगी टी20 मालिकेत फायनलमध्ये धडक मारली आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India Women vs West Indies Women: भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिरंगी टी20 मालिकेत झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताच्या या विजयात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर 95 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय महिलांनी 13.5 षटकांतच 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. त्यामुळे भारतीय संघ आता अंतिम सामन्यात २ फेब्रुवारी रोजी यजमान दक्षिण आफ्रिका महिला संघाचा सामना करेल.

(India Women won by 8 wickets against West Indies Women and enters in T20I Tri Series Final)

India Women Cricket Team
U19 World Cup Final: U19 टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकताच सिनियर्सचा 'कल्ला', Video Viral

भारताची 95 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. भारताने सलामीला फलंदाजीला आलेल्या स्मृती मानधनाला दुसऱ्याच षटकात शामिलिया कॉनेलने 5 धावांवरच त्रिफळाचीत केले.

पण नंतर हर्लिन देओल आणि जेमिमाह रोड्रिग्ज यांनी डाव सावरताना 33 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असताना हर्लिनला 13 धावांवर हेली मॅथ्युजने बाद केले.

पण त्यानंतर जेमिमाहसह कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 54 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. जेमिमाहने नाबाद 41 धावांची खेळी केली. तसेच हरमनप्रीतने नाबाद 32 धावांची खेळी केली.

India Women Cricket Team
U19 Team India च्या पोरींचा संघर्षही मोठाच! कोणाचे वडील शिपाई, कोणाच्या आईने सोसले घाव

तत्पूर्वी, भारताच्या फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिज संघ 100 धावाही पार करणार नाही याची काळजी घेतली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली.

तसेच झाईदा जेम्सने नाबाद 21 धावांची खेळी केली. या दोघींशिवाय केवळ शकिबा गजनबीला (12) दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताकडून दीप्तीने 4 षटकात 11 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच राजेश्वरीने 4 षटकात 9 धावा देत 1 विकेट घेतली. तसेच पुजा वस्त्राकरने 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ 20 षटकात 6 बाद 94 धावाच करू शकला.

या सामन्यासह तिरंगी मालिकेतील साखळी फेरी संपली आहे. साखळी फेरीत भारताने 4 सामन्यातील तीन सामने जिंकले, तसेच एक सामना रद्द झाला. तसेच दक्षिण आफ्रिकेने 4 सामन्यातील 2 सामने जिंकले, तर 1 सामना पराभूत झाला आणि 1 सामना रद्द झाला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला मात्र साखळी फेरीत एकही सामना जिंकता आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com