

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात आता अंतर्गत कलह उफाळून आला आहे. टीम इंडियाने १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद युसूफ यांनी विद्यमान खेळाडूंवर कडक शब्दांत टीका केली होती. मात्र, आता अष्टपैलू खेळाडू शादाब खानने या टीकेला सडेतोड उत्तर देत माजी खेळाडूंच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शादाब खान कमालीचा आक्रमक दिसला. आफ्रिदी आणि युसूफ यांच्या टीकेबाबत विचारले असता तो म्हणाला, "आमच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानसाठी मोठे योगदान दिले असेल, ही त्यांची वैयक्तिक मते असू शकतात. पण वस्तुस्थिती ही आहे की, ते त्यांच्या काळात विश्वचषकात भारताला कधीही हरवू शकले नाहीत. २०२१ च्या विश्वचषकात भारताचा पराभव करणारा आमचाच संघ होता. हे खेळाडू दिग्गज नक्कीच आहेत, पण विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांनीही अशी कोणतीही संस्मरणीय कामगिरी केलेली नाही, ज्याची आज आठवण काढावी लागेल."
या वादाची ठिणगी मोहम्मद युसूफ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने पडली होती. युसूफ यांनी 'एक्स'वर लिहिले होते की, "बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांची वेळ आता संपली आहे. पाकिस्तानला दुबळ्या संघांविरुद्धच्या विजयाची नव्हे, तर नवीन आणि धाडसी खेळाडूंची गरज आहे." दुसरीकडे, एका टीव्ही शोमध्ये बोलताना शाहिद आफ्रिदीने या तिन्ही वरिष्ठ खेळाडूंना टी-२० संघातून कायमचे वगळण्याचा सल्ला दिला होता. या वरिष्ठ खेळाडूंना डच्चू देऊन भविष्यासाठी नवीन संघ बांधणी करावी, असे आफ्रिदीचे म्हणणे होते.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल केले, ज्यामध्ये कर्णधार बाबर आझम फलंदाजीला आलाच नाही. यावर स्पष्टीकरण देताना शादाब म्हणाला की, संघ व्यवस्थापनाने कोणतेही अनावश्यक प्रयोग केलेले नाहीत. बाबरला त्याची भूमिका नीट ठाऊक आहे आणि कोणत्या परिस्थितीत मैदानावर उतरायचे याचा निर्णय रणनीतीनुसार घेतला जातो. नामिबियावर १०२ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानने सुपर-८ मध्ये मजल मारली असली, तरी भारताविरुद्धच्या पराभवाच्या जखमा आणि खेळाडूंमधील हा शाब्दिक युद्ध आगामी काळात संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.