

Gambhir Reaction Kohli Rohit Retirement : मीही माणूस आहे आणि चुका होण्याचे अधिकार मलाही आहेत. खेळाडूंनीही चुका केल्या, तर दोष देऊ नये, असे व्यापक मत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले. या उत्तराला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा संदर्भ होता.
एका मुलाखतीमध्ये गंभीर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी त्यास गंभीर यांना जबाबदार धरले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयश येत असताना गंभीर आणि रोहित-विराट यांच्यातील संबंध बिघडले असल्याची जोरदार चर्चा होती.
त्यानंतर या दोघांनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. याबाबत गंभीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मतप्रदर्शनही केले होते. याबाबत विचारले असता गंभीर यांनी हे मत व्यक्त केले. खेळाडूंकडून चुका होऊ शकतात, प्रशिक्षकपदाच्या १८ महिन्यांच्या काळात माझ्याकडूनही चुका झाल्या असतील, हे मी नाकारत नाही.
योग्य हेतूने घेतलेले चुकीचे निर्णय स्वीकारार्ह असतात, परंतु चुकीचा हेतू आणि चुकीचे निर्णय हे कदापि मान्य नसते, असे गंभीर यांनी ठामपणे सांगितले. गंभीर यांनी हे उत्तर देताना रोहित आणि विराट यांच्या नावाचा उल्लेख मात्र केला नाही किंवा या दोघांच्या निर्णयाशी आपला संबंध असल्याचे सांगितले नाही. त्यांनी एकूणच आपली भूमिका मांडली.
आपल्यासाठी प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी जोपर्यंत या पदावर आहे, तोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येकाकडून याचीच अपेक्षा आहे. तरच मी माझ्या पदाला न्याय दिला असे म्हणू शकेन, असे गंभीर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.