

जयपूर: तुल्यबळ संघांविरुद्ध एकूण १० कसोटी सामने भारताने गमावले असल्यामुळे बीसीसीआय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना बदलण्याची चर्चा होत आहे. व्हाईटबॉल प्रकारात मात्र भारतीयांची कामगिरी चांगली असल्यामुळे या प्रकारात त्यांचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे.
गौतम गंभीर हे प्रशिक्षक झाल्यानंतर मायदेशात अगोदर न्यूझीलंडविरुद्ध त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉश स्वीकारण्याची वेळ भारतीय संघावर आली. त्यामुळे बीसीसीआय प्रशिक्षकपदासाठी दुसरा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे आणि त्यांनी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडे ते इच्छुक आहेत का, अशी विचारणा करत असल्याचे समजते.
परंतु बीसीसीआयच्या अकादमीत प्रमुख असलेले लक्ष्मण सध्याच्या आपल्या जबाबदारीत समाधानी असल्याचेही सांगण्यात येत आहे. गंभीर यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०२७ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत आहे. कसोटी क्रिकेट अजिंक्यपदाचे २०२५ त २०२७ असे वर्तुळ आहे.
यात आता भारताच्या नऊ कसोटी शिल्लक आहेत; परंतु त्यासाठी गंभीर यांच्यावर विश्वास कायम ठेवण्याबाबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. भारताला आता पुढच्या काळात श्रीलंकेत दोन, न्यूझीलंड दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
या नऊपैकी किमान सात सामने जिंकले तरच कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात प्रवेश करता येईल, असे सध्याचे गणित आहे. येत्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले किंवा भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर व्हाईटबॉल प्रकारातील त्यांचे मुख्य प्रशिक्षकपद पुढच्या काळातही कायम राहील; परंतु कसोटी प्रकारात ते कायम राहतील, याबाबत आताच सांगता येणार नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.