IND vs ENG: आकाश दीपची गोलंदाजी ते जुरेल-गिलची भागीदारी, पिछाडीनंतरही भारताने रांची कसोटी कशी जिंकली? वाचा 5 कारणे

India win 4th Test against England: इंग्लंडविरुद्धच्या चौथा कसोटीतील भारताच्या विजयासाठी कोणत्या पाच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, त्याचा घेतलेला आढावा.
Team India Series win against England
Team India Series win against EnglandPTI

Five reasons behind India win fourth Test at Ranchi against England

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू असून 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान रांचीमध्ये चौथा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताने चौथ्याच दिवशी हा विजय मिळवला असला, तरी हा विजय सोपा नव्हता. दरम्यान भारताच्या विजयासाठी कोणत्या पाच गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, त्यावर एक नजर टाकू.

  • आकाश दीपने वरची, तर जडेजाने तळातली फलंदाजी केली उद्ध्वस्त

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन दिवशी फलंदाजीला खेळपट्टी पोषक होती. मात्र असे असले तरी इंग्लंडला सुरुवातीलाच भारताच्या पदार्पणवीर आकाश दीपने मोठे धक्के दिले. त्याने बेन डकेट आणि ऑली पोप यांना एकाच बाद केले. त्यानंतर 42 धावांवर झॅक क्रावलीलाही बाद केले.

वरची फळी झटपट बाद झाल्याने इंग्लंड दबावात आले होते. परंतु, जो रुटने इंग्लंडचा डाव सावरला. त्याने बेरस्टोबरोबर 52 धावांची भागीदारी केली. तसेच बेन फोक्सबरोबर 113 धावांची भागीदारी केली. त्यानंतरही त्याने ऑली रॉबिन्सनला साथीला घेतले होते. त्यामुळे इंग्लंड 3 बाद 57 धावांवरून पहिल्या दिवशी 7 बाद 302 धावांपर्यंत पोहचले होते.

परंतु, दुसऱ्या दिवशी जडेजाने पहिल्याच तासात इंग्लंडच्या तळातल्या फलंदाजांना बाद करत इंग्लंड मोठी धावसंख्या उभारणार नाही याची काळजी घेतली.

  • जयस्वालच्या अर्धशतकानंतर जुरेलची तळातल्या फलंदाजांबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी

इंग्लंड संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, भारताने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या, तरी एक बाजू यशस्वी जयस्वालने सांभाळताना अर्धशतक ठोकसे. परंतु तो 73 धावांवर बाद झाला. एकवेळ भारतीय संघ ७ बाद 177 धावा अशा स्थितीत होता.

परंतु, त्यावेळी आपला दुसराच सामना खेळणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. त्याने 8 व्या विकेटसाठी कुलदीप यादवबरोबर 76 धावांची, तर 9 व्या विकेटसाठी आकाश दीपबरोबर 40 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 300 धावांचा टप्पा सहज पार केला.

परंतु, जुरेल 90 धावांवर बाद झाला. मात्र, तो बाद झाला, तेव्हा त्याने भारताला 307 धावांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे इंग्लंडला केवळ 46 धावांची आघाडी घेता आली.

Team India Series win against England
IND vs ENG: 'त्यांनाच संधी देणार, ज्यांच्यात कामगिरी करण्याची भूक आहे', रांची कसोटीनंतर रोहित काय म्हणाला? वाचा
  • दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी विणले जाळे

पहिल्या डावात साडेतीनशे धावा करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागला. भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीला आर अश्विनने डकेट आणि पोप यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले, त्यानंतर जो रुटलाही त्याने स्वस्तात बाद केलं. या धक्क्यांतून इंग्लंड संघ सावरू शकला नाही.

अर्धशतक करणाऱ्या क्रावलीचा अडथळाही कुलदीपने दूर करताना इंग्लंडची संपूर्ण मधली फळीच त्याने माघारी धाडली. बेअरस्टोलाही रविंद्र जडेजाने बाद केले. अखेरच्या दोन विकेट्स अश्विनने झटपट घेत पाच विकेट्स घेण्याबरोबरच इंग्लंडला 145 धावांवरच रोखले.

दुसऱ्या डावाच भारताने एकूण 53.5 षटके गोलंदाजी केली. यातील केवळ 3 षटके वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकली. बाकी सर्व षटकांत भारताचे फिरकीपटू आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवने टाकले.

  • रोहित-जयस्वालने दिली चांगली सुरुवात

दरम्यान, चौथा डाव महत्त्वाचा होता. इंग्लंडने 46 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 192 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताला चौथ्या डावात फलंदाजी करायची होती. त्यावेळी खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक झाली होती. खेळपट्टीवरील भेगा उघडल्या होत्या.

अशात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताला 84 धावांची सलामी दिली. जयस्वालने 37 धावा केल्या, तर रोहितने या खेळपट्टीवर अर्धशतक केले. त्याने 55 धावा केल्या.

Team India Series win against England
IND vs ENG, Test: इंग्लंडचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले, गिल-जुरेलने केला टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब
  • गिल-जुरेलची विजय मिळवून देणारी भागीदारी

192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित आणि जयस्वालच्या विकेट्स गमावल्यानंतर रजत पाटीदार, रविंद्र जडेजा आणि सर्फराज खान यांच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. भारतीय संघाने 120 धावांवरच 5 विकेट्स गमावल्या होत्या.

जुरेल फलंदाजीला आला, तेव्हा भारताला जवळपास 72 धावांची गरज होती. पण त्याने संयमी खेळणाऱ्या गिलला चांगली साथ दिली. गिलनेही परिस्थिती लक्षात घेत कोणतीही जोखीम न घेत फलंदाजी केली. हळुहळू त्या दोघांनाही भारताचा धावफलक हलता ठेवत विजयाकडे मार्गक्रमण केले होते.

अखेर विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर गिलने आक्रमक फटके खेळत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी अखेरपर्यंत इंग्लंडला आणखी यश मिळू दिले नाही. त्यामुळे नाबाद 72 धावांची भागीदारी करत जुरेल आणि गिलने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com