IND vs ENG, Test: इंग्लंडचे मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले, गिल-जुरेलने केला टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब

India won 4th test against England: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध रांचीत झालेला चौथा कसोटी सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
Shubman Gill and Dhruv Jurel
Shubman Gill and Dhruv JurelX/BCCI

India Won 4th Test Match by 5 Wickets against England in Ranchi

भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी (26 फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध रांचीमध्ये पार पडलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच मिळवलेल्या या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतही 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे इंग्लंडचे मालिका विजयाचे स्वप्न मात्र भंगले आहे. तसेच भारताने 12 वर्षांपासून कसोटी मालिकेत अपराजित राहण्याची मालिकाही कायम ठेवली आहे. तसेच बेन स्टोक्सने पूर्णवेळ कर्णधार म्हणून आणि ब्रेंडन मॅक्युलमने प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर इंग्लंड पहिल्यांदाच कसोटी मालिका पराभूत झाले आहेत.

या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 61 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी महत्त्वपूर्ण 72 धावांची नाबाद भागीदारी केली.

Shubman Gill and Dhruv Jurel
IND vs ENG: रुटची विकेट वादाच्या भोवऱ्यात! माजी इंग्लंड कर्णधाराने DRS वर व्यक्त केला राग, नंतर पोस्ट केली डिलीट

भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 8 षटकापासून आणि बिनबाद 40 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी भारताला विजयासाठी 152 धावांची गरज होती. सुरुवातीला रोहित आणि जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून भारतीय संघाच्या डावाचा पाया भक्कम रचला होता.

पण 84 धावांच्या भागीदारीनंतर 18 व्या षटकात जयस्वालला जो रुटने 37 धावांवर माघारी धाडले. नंतर रोहितने आपला खेळ कायम ठेवत अर्धशतक केले, पण त्याचाही अडथळा टॉम हर्टलीने दूर केला.रोहितने 55 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर लेगचच शुन्यावर रजत पाटीदारही माघारी परतला.

लंचब्रेकनंतर इंग्लंडकडून शोएब बशीरने भारताला दबावात टाकले होते. त्याने 39 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर रविंद्र जडेजा आणि सर्फराज खानला बाद केले. त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळत असलेल्या खेळपट्टीवर टिकून राहून विजयापर्यंत पोहचण्याचे भारतासमोर आव्हान होते.

परंतु, एक बाजू सांभाळलेल्या शुभमन गिलला नंतर ध्रुव जुरेलची चांगली साथ मिळाली. त्यांनी अर्धशतकीही भागीदारीही केली. नंतर विजय आवाक्यात आल्यानंतर गिलने आक्रमकता दाखवत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. तसेच या दोघांनी भारताच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. गिल 52 धावांवर नाबाद राहिला, तर जुरेल 39 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून बशीरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच जो रुट आणि टॉम हर्टली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Shubman Gill and Dhruv Jurel
DRS मधील अंपायर्स कॉल म्हणजे नक्की काय? केव्हा केला जातो वापर, जाणून घ्या

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 104.5 षटकात सर्वबाद 353 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रुटने 122 धावांची नाबाद खेळी केली, तर ऑली रॉबिन्सनने 58 धावा केल्या. या डावात भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारताने पहिल्या डावात 103.2 षटकात सर्वबाद 307 धावा केल्या. या डावात ध्रुव जुरेलने सर्वाधिक 90 धावा केल्या, तसेच यशस्वी जयस्वालने 73 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून या डावात शोएब बशीरने 5 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडचा दुसरा डाव 53.5 षटकात अवघ्या 145 धावांवर गडगडला. त्यांच्याकडून झॅक क्रावलीने 60 धावांची खेळी केली. भारताकडून आर अश्विनने 5 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर 192 धावांचे आव्हान ठेवले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com