

२०२६ च्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपचा थरार नुकताच पार पडला असून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली आहे. मात्र, या दिमाखदार विजयासोबतच एका वादानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामना सुरू असताना भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना न्यूझीलंडच्या डावातील ११ व्या षटकात घडली. अर्शदीप गोलंदाजी करत असताना मिचेलने चेंडू मारला, जो अर्शदीपने आपल्या दिशेने अडवला. त्यानंतर अर्शदीपने तो चेंडू पुन्हा यष्ट्यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकून डेरिल मिचेलला लागला. या घटनेनंतर मिचेल कमालीचा संतापला आणि अर्शदीपच्या दिशेने रागात पुढे सरसावला. अर्शदीप पुन्हा आपल्या रन-अपवर परतला, ज्यामुळे मिचेलचा राग अधिकच अनावर झाला. दोन्ही खेळाडूंमधील तणाव पाहून वातावरण गरम झाले होते.
मैदानावर निर्माण झालेला हा तणाव पाहून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव तातडीने धावून आला. त्याने परिस्थिती हाताळत मिचेलची समजूत काढली, तर मैदानातील पंचांनी अर्शदीपशी संवाद साधला. कॅप्टन सूर्याच्या मध्यस्थीमुळे मोठा वाद टळला. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर अखेरीस दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले आणि सामना पुन्हा पूर्ववत झाला.
सामन्याच्या निकालाचा विचार करता, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना किवी फलंदाज कोलमडले. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव तग धरू शकला नाही. अखेर भारताने ९६ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विश्वचषक उंचावला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.