
Heart Disease Deaths India: भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेने (Sample Registration Survey) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून धक्कादायक खुलासा झाला आहे. देशात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार (Cardiovascular Diseases) हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले. 'मृत्यूच्या कारणांवरील अहवाल 2021-2023' (Report on Causes of Death: 2021-2023) नुसार, देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास 31 टक्के मृत्यू हृदयविकारांमुळे झाल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल भारतातील सार्वजनिक आरोग्यापुढील मोठी आव्हाने समोर आणतो.
दरम्यान, हा अहवाल विविध राज्यात वयोगटांमध्ये आणि लिंगानुसार मृत्यूच्या कारणांचे सखोल विश्लेषण सादर करतो. या आकडेवारीनुसार, देशात असंसर्गजन्य आजार (Non-Communicable Diseases) हे मृत्यूचे मुख्य कारण बनले आहेत. एकूण मृत्यूंपैकी तब्बल 56.7 टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होतात, तर सांसर्गिक (Communicable) आजार, माता-शिशूंचे आजार आणि कुपोषण यामुळे 23.4 टक्के मृत्यू होतात. 2021-2023 या काळात ही आकडेवारी 2020-2022 च्या तुलनेत जवळपास स्थिर आहे, ज्यावरुन असंसर्गजन्य आजारांचे आव्हान वाढत असल्याचे स्पष्ट होते.
हृदयविकारांव्यतिरिक्त, अहवालाने इतर काही प्रमुख कारणांची नोंद घेतली आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत. ही प्रमुख कारणे आणि त्यांचे टक्केवारीनुसार प्रमाण खालीलप्रमाणे:
हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार (Cardiovascular Diseases): 30.7%
श्वसनसंस्थेचे संक्रमण (Respiratory Infections): 9.3%
कर्करोग (Malignant And Other Neoplasms): 6.4%
श्वसनसंस्थेचे आजार (Respiratory Diseases): 5.7%
पचनसंस्थेचे आजार (Digestive Diseases): 5.3%
या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, आधुनिक जीवनशैली (Lifestyle), खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता ताण यामुळे होणारे आजार भारतीयांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका बनले आहेत.
तसेच, या अहवालातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वयानुसार मृत्यूच्या कारणांमध्ये होणारा बदल.
30 वर्षांवरील व्यक्तींमध्ये: या वयोगटातील लोकांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहेत. चुकीची जीवनशैली, कमी शारीरिक हालचाल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे हे आजार वाढले आहेत.
15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये: या वयोगटातील मृत्यूचे सर्वात सामान्य कारण म्हणजे आत्महत्या. हे एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक सत्य समोर आणते, ज्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
अज्ञात तापामुळे (Fever Of Unknown origin) 4.9% मृत्यू होतात.
अपघातामुळे (मोटार वाहन अपघाताव्यतिरिक्त) 3.7% मृत्यू होतात.
मधुमेहामुळे (Diabetes) 3.5% मृत्यू होतात.
याव्यतिरिक्त, एकूण 9.4 टक्के मृत्यू दुखापतींमुळे होतात आणि 10.5 टक्के मृत्यू 'अज्ञात कारणांमुळे' होतात, ज्यातील बहुतांश मृत्यू वृद्ध वयोगटातील (70 वर्षांवरील) लोकांमध्ये नोंदवले गेले आहेत.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने सादर केलेला हा अहवाल देशातील आरोग्य धोरण ठरवणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ आहे. अहवालातील निष्कर्षांवरुन असे दिसून येते की, आरोग्य यंत्रणेला आता सांसर्गिक आजारांप्रमाणेच असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी जनजागृती मोहीम, जीवनशैलीत बदल आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक आहे.
अहवालात म्हटले की, "अभ्यासातील काही मर्यादा असूनही देशातील मृत्यूच्या परिस्थितीची आणि त्यापुढील आव्हानांची माहिती देण्यास हे निष्कर्ष नक्कीच मदत करतील."
तसेच, या अहवालातील आकडेवारी लिंग, वय, राहण्याचे ठिकाण (शहरी/ग्रामीण) आणि देशातील प्रमुख भौगोलिक विभागांनुसार वर्गीकृत करण्यात आली आहे. ज्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना विशिष्ट विभागांसाठी आणि लोकसंख्येच्या गटांसाठी योग्य धोरणे आखण्यास मदत होईल. एकूणच हा अहवाल केवळ आकडेवारी सादर करत नाही, तर देशातील सार्वजनिक आरोग्याची स्थिती दर्शवतो आणि भविष्यातील आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी एक दिशा देतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.