
सिंधुदुर्ग: गोव्यातील राजकीय दबावानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडाळ, सिंधुदुर्ग येथे आयोजित नोकर भरती एमआरएफ टायर्सने रद्द केल्याची घोषणा केली. फोंडा, गोवा येथील नोकरीसाठी महाराष्ट्रात मुलाखती घेऊन तेथील तरुणांना प्राधान्य का दिले जातंय? असा सवाल गोव्यातील राजकीय नेत्यांनी उपस्थित केला. नोकर भरतीच्या राजकीय वादंगानंतर एमआरएफने केलेली सारवासारव देखील त्यांना अडचणीची ठरली अन् त्यांनी थेट भरतीच रद्द केली.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी एमआरएफ नोकरभरतीचा मुद्दा प्रकाशात आणला. राज्यातील वाढती बेरोजगारी, युवकांचे स्थलांतर आणि आर्थिक मंदीचा मुद्दा सरदेसाईंनी उपस्थित केला.
“कंपनी राज्याची जमीन आणि स्त्रोत वापरून स्थानिकांना नोकरी नाकारत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी हस्तक्षेप करुन भरती गोव्यात घेतली जावी अशी सूचना कंपनीला करावी, तसेच गोमंतकीयांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जावे असे आश्वस्त करावे”, अशी मागणी सरदेसाईंनी केली.
विजय सरदेसाई यांनी भरतीला केलेल्या या विरोधाची तत्काळ दखल एमआरएफ कंपनीने घेतली आणि कुडाळ येथील नोकरभरती खोटी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर ही भरती कुडाळ ऐवजी गोव्यातील फर्मागुडी येथे त्याच दिवशी (१२ सप्टेंबर) रोजी मुलाखती आयोजित केल्या जातील असे कंपनीने मुख्यमंत्री सावंत यांना पत्र लिहून स्पष्ट केले.
दुसरीकडे एमआरएफची कुडाळ येथील नोकरभरती खरीच असल्याचे स्पष्टीकरण भरतीचे आयोजक मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिले. परब यांनी कंपनीकडून प्राप्त झालेला ई-मेलच पुरावा म्हणून सादर केला. त्यामुळे नक्की कोण खरं आणि खोटं बोलतंय असा संभ्रम निर्माण झाला.
“एमआरएफचा खोटेपणा समोर आला आहे. गोमंतकीयांना धोका, आमच्या जमीन व स्त्रोतांचा वापर आणि नोकरी परराज्यातील लोकांना. MRF ने परराज्यात नोकर भरती घेण्याचे धाडस करु नये, त्यांनी घेतल्या तर आरजी त्यांना चांगलाच धडा शिकवेल”, असा इशारा आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिला. तसेच, भाजप या सगळ्या धोकाधडीला सहकार्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुरुवारी दिवसभर भरतीवरुन झालेल्या राजकीय वादंगानंतर शुक्रवारी एमआरएफ टायर कंपनीने कुडाळ येथील प्रशिक्षणार्थी पदांसाठी १२ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली भरती रद्द केल्याचे जाहीर केले. कंपनीने सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना ई-मेल लिहून तांत्रिक कारणास्तव एचआर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत भरती रद्द केल्याचे स्पष्ट केले.
आमदार विजय सरदेसाईंनी राज्यातील युवकांना खासगी क्षेत्रात ८० टक्के नोकरी देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी फार्मा कंपन्यांनी पुणे, मुंबईत आयोजित केलेल्या मुलाखतीवर आवाज उठवला होता. खासगी क्षेत्रातील कंपन्या सरकारला घाबरतच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
मनसेने आयोजित केलेली नोकर भरती काय होती?
मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी एमआरएफ टायर कंपनीसाठी नोकर भरती आयोजित केली होती. या भरतीच्या माध्यमातून २५० प्रशिक्षणार्थी पदे भरली जाणार होती. गोव्यातील फोंडा येथे नोकरीचे ठिकाण होते. ही नोकरभरती पूर्णपणे मोफत असल्याचे मनसे जाहीर केले होते. नोकरीसाठी राहण्याची व्यवस्था, पर्मनंट होण्याची संधी आणि वार्षिक पगारवाढ अशा सुविधा नमूद करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, एमआरएफ लिमिटेड या कंपनीने सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कुडाळ येथील नियोजित मुलाखत केंद्र रद्द केल्यानंतर शुक्रवारी (१२ सप्टेंबर) अखेर फर्मागुढी फोंडा येथील आयटीआय कॅम्पसमध्ये मुलाखती घेतल्या आणि वादावर पडदा पडला.
यापूर्वीही परराज्यात मुलाखतींवर वरुन वाद
गेल्याच वर्षी (२०२४) गोव्यातील काही फार्मा कंपन्यांनी पुणे, मुंबईत विविध पदांसाठी मुलाखती आयोजित केल्या होत्या. त्यावेळी देखील विजय सरदेसाई, मनोज परब, युरी आलेमाव यांनी आवाज उठवत गोमंतकीय तरुणांना या नोकरीसाठी प्राधान्य देण्याची मागणी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या मुलाखती रद्द करण्यात आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.