

मडगाव: गोव्यातील पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम देण्याऐवजी भलतीच कामे दिली जात आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिसांची अकार्यक्षमता हा कळीचा मुद्दा झाला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात पर्यटनालाही धाेका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे पाेलिसांना भलती सलती कामे न देता त्यांना योग्य कामासाठीच वापरावे आणि जे सक्षम गोवेकर अधिकारी आहेत, त्यांचीच माेक्याच्या ठिकाणी अधिकारी म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. वास्काे येथे पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी ही चिंता व्यक्त केली आहे.
गाेव्यात जर सर्वसामान्य लोक सुरक्षित नाहीत तर पर्यटक कसे सुरक्षित राहतील, असा सवाल करून उद्या काही आगळे-वेगळे झालेच आणि कुठल्याही देशाने आपल्या पर्यटकांना गोव्यात जाऊ नका, अशी सूचना जर केल्यास गोव्याचे नाव जागतिक नकाशावर खराब होईल आणि गोव्याच्या पर्यटनालाही ते मारक ठरेल, असे ते म्हणाले.
ज्या महिला पोलिस निरीक्षकावर भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले कित्येक गुन्हे नोंद झाले आहेत, अशा महिला निरीक्षकाकडे पूजा नाईक नोकरी घाेटाळ्याच्या चौकशीचे काम दिले आहे. गोव्यातील पोलिस खाते वरपासून खालीपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.