
पणजी: भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासात शेतीचा मोलाचा वाटा आहे. विकसित भारताचा मार्ग शेतातूनच जातो. म्हणूनच शेती ही केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता तिचे मूल्यवर्धन, विपणन आणि उद्योजकतेशीही शेतकऱ्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आज जुने गोवे येथे केले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्रात उपराष्ट्रपती संशोधकांशी संवाद साधत होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते शेतकरी संजय पाटील उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, नैसर्गिक शेती ही केवळ एक शेतीपद्धत नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. गुजरातचे राज्यपाल आणि ‘पद्मश्री’ सन्मानित आचार्य देवव्रत यांच्या हृदयात, मेंदूत आणि आत्म्यात नैसर्गिक शेती रुजलेली आहे. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊया. धनखड यांनी आपल्या भाषणात १९८९ या वर्षाचा उल्लेख केला.
हेच वर्ष माझ्या राजकीय प्रवासाची सुरवात होते आणि याच वर्षी या संशोधन केंद्राची स्थापना झाली. हा योगायोग नव्हे तर नियतीचा इशारा आहे की मला कृषी विषयाशी घट्ट जोडले जावे. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनापुरतेच आपले योगदान सीमित न ठेवता, उत्पादनानंतरच्या टप्प्यांमध्येही सक्रिय सहभाग घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
आपल्या गावांमध्ये दूध, दही, ताक, लोणी, आईस्क्रीम यांचे उत्पादन आणि प्रक्रिया स्थानिक पातळीवरच व्हायला हवी. आपण आपल्या मुलांना आयआयटी, आयआयएममध्ये शिकवतो. पण ते शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योगात येत नाहीत, हे दुर्दैव आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.