
Tillari Canal Repair Works
दोडामार्ग: धनगरवाडी-कुडासे येथे फुटलेल्या तिळारी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील यांनी पाहणी केली. तालुक्यातील कालव्यालगतच्या असलेल्या शेतकऱ्यांची पाण्याची गरज, गोवा राज्याचा बंद झालेला पाणीपुरवठा लक्षात घेता चार दिवसांत कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी सांगितले.
स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार हे काम योग्य पद्धतीने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धनगरवाडी-कुडासे येथे शुक्रवारी (ता. २४) सकाळी तिळारी प्रकल्पाचा डावा कालवा फुटला. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद केले गेले. परिणामी या कालव्यालगत असलेल्या शेती-बागायती पाण्यावाचून ओस पडणार आहेत.
शिवाय गोवा राज्याला होणारा पाणीपुरवठादेखील बंद करण्यात आला आहे. गोव्यातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होऊ नये तसेच पर्यटनावर देखील विपरित परिणाम होऊ नये, यासाठी गोवा सरकारने लवकरात लवकर कालवा दुरुस्त करून पाणी सोडण्याची मागणी येथील जलसंपदा विभागाकडे केली आहे.
पाण्याची निकड लक्षात घेत फुटलेल्या कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. तेथे मोरी असल्याने मशीनच्या साहाय्याने प्रथम सर्व माती बाजूला करून पाईप काढण्यात आले आहेत. नवीन सिमेंट पाईप आणले आहेत. माती काढून तेथे दगड व काँक्रिटीकरणाने भक्कम पाया केला जाणार आहे. त्याच्यावर सिमेंट पाईप बसवून मातीचा भराव व लायनिंग करून कालवा दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम योग्य पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.