

पणजी: शापोरा नदीवरील साळ येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा मंगळवारी बंद करण्यात आल्याने नदीचे पाणी अडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बंधाऱ्यात साठवलेले पाणी शक्तिशाली पंपांच्या साहाय्याने आमठणे धरणात नेण्यात येणार असून तेथून पुढे अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलाशयापर्यंत पोहोचवले जाणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातून येणारा तिळारी कालवा देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असतानाही बार्देश व पेडणे तालुक्यांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. साळ बंधाऱ्यातून दररोज सुमारे २५० दशलक्ष लिटर (२५ कोटी लिटर) पाणी उचलण्याची क्षमता आहे. बंधाऱ्यावरून पाणी उपसा करण्यासाठी शक्तिशाली पंप बसवण्यात आले असून, त्याद्वारे हे पाणी १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून आमठणे धरणापर्यंत नेले जाणार आहे.
आमठणे धरणावरही शक्तिशाली पंप बसवण्यात आले आहेत. तेथून पुन्हा १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलाशयात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे साळपासून आमठणे आणि तेथून अस्नोडा असा पाण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.
साळ येथे बंधारा उभारून शापोरा नदीचे पाणी अडवण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. मंगळवारी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याचा शेवटचा दरवाजा बंद करण्यात आला. आमठणे धरणावर पंप बसवणे हे आपण महत्त्वाचे उद्दिष्ट मानले होते आणि त्यानुसार आता शापोरा नदीतील पाणी आमठणे धरणापर्यंत आणून ते अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मंत्री शिरोडकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
महाराष्ट्राच्या हद्दीत तिळारी कालव्याची देखभाल व दुरुस्तीची कामे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाणार आहेत. त्यामुळे या काळात कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत साळ बंधाऱ्यात अडवलेले शापोरा नदीचे पाणी आमठणे धरणात उचलून नेण्यात येणार आहे. त्यानंतर हे पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचवले जाईल.
त्यामुळे तिळारीचे पाणी उपलब्ध नसतानाही अस्नोडा प्रकल्पाला अतिरिक्त पाण्याचा स्रोत उपलब्ध राहणार आहे. साळ बंधाऱ्यातून उपलब्ध होणारे पाणी केवळ अस्नोड्यापुरते मर्यादित राहणार नसून, अस्नोडा, पर्वरी, पिळर्ण आणि आसगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या पाणीपुरवठ्यालाही त्याचा फायदा होणार आहे.
बंधारा प्रकल्पावर २२९ कोटी खर्च!
साळ बंधारा प्रकल्पावर राज्य सरकारने २२९ कोटी १२ लाख १८ हजार ९२९ रुपये खर्च केले आहेत. या बंधाऱ्यामुळे ३ लाख १३ हजार १८७ जणांना पाणीपुरवठा होणार असे सरकारचे म्हणणे आहे. २५ एप्रिल २०२३ रोजी या कामास सुरवात करण्यात आली होती. आमठाणे येथे पहिल्या पंपिंग स्टेशनवर २८ कोटी ४६ लाख ८९ हजार ४६७ रुपये तर दुसऱ्या पंपिंग स्टेशनवर ६२ कोटी ३२ लाख ३५ हजार ८४७ रुपये खर्च केले आहेत.
नियोजनबद्ध पद्धतीने वापर
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, की जलसंपदा खात्याचे काम सांभाळल्यापासून अस्नोड्याची क्षमता वाढवणे माझे उद्दीष्ट मानले व ते आता कार्यान्वित झाले याचे समाधान आहे. पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टीने साळ बंधारा आणि आमठणे धरणावरील पंपिंग व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.