
पणजी: "साखळी येथील भाजप कार्यालयात घडलेली चोरी हीच राज्यातील पोलिस यंत्रणेचे अपयश दर्शवते. ही जबाबदारी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरच आहे. या चोरीच्या घटनेने स्पष्ट होते की गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे", गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.
“सत्ताधारी पक्षाचेच कार्यालय सुरक्षित नसेल तर गोव्यातील पोलिसी यंत्रणा व राज्यकारभार यांची स्थिती किती बिकट आहे, हे यातून दिसून येते. रोजच्या रोज गोव्यात चोरी, दरोडे, गुन्हेगारी घडत असून हे अपयशी सरकार काहीही नियंत्रण ठेवू शकत नाही,” असा आरोप पणजीकरांनी केला.
“राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, अमली पदार्थांशी संबंधित हिंसाचार, राज्यभर वाढलेला ड्रग्सचा व्यापार, मारहाणीच्या घटना आणि टोळी यामागे भाजप सरकारचा अपयशी कारभार जबाबदार आहे,” असे पणजीकर म्हणाले.
"पोलीस दलात आवश्यक मनुष्यबळ नाही, साधने नाहीत. पोलीस यंत्रणा आता जनतेपेक्षा सत्ताधाऱ्यांच्या रक्षणासाठीच काम करत आहे,” असा गंभीर आरोप पणजीकरांनी केला. साखळीतील ही घटना मुख्यमंत्र्यांसाठी लज्जास्पद असल्याचे पणजीकर म्हणाले.
“गोवा पोलिसांची गस्त व्यवस्था पूर्णपणे फसलेली आहे, त्यामुळे चोरट्यांना घर, दुकाने आणि व्यवसायिक ठिकाणे टार्गेट करणे सोपे झाले आहे. गोमंतकीयांची सुरक्षितता ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे, केवळ जाहिरातबाजी व राजकीय दिखावा नको,” असे पणजीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.