
मडगाव: मागच्या ७२ तासांत गोव्यात रस्त्यांवरील अपघातांतील ६ बळींची नोंद झाल्याने राज्यातील धोकादायक वाहतुकीबद्दलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १ जानेवारी ते २० मे या १४० दिवसांच्या अवधीत तब्बल १०६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
यातील ८० बळी हे दुचाकी अपघातातील आहेत. रस्त्यांवरून पायी चालताना वाहनाने धक्का दिल्याने १८ पादचारी मृत्युमुखी पडलेले आहेत.
काल १९ मे रोजी राज्यात विविध ठिकाणी पाच अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर १८ मे रोजी दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचे बळी गेले होते.
वाहतूक पोलिस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या पहिल्या १४० दिवसांत १०२ अपघात असे होते, ज्यात १०६ जणांचा बळी गेला. त्यातील ६७ बळी हे दुचाकीस्वारांचे तर १३ बळी दुचाकीच्या मागे बसलेल्या स्वारांचे आहेत.
अन्य वाहनचालकांच्या तीन बळींची नोंद असून १८ पादचारी मृत पावले आहेत. बसमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांचा मागच्या पावणे पाच महिन्यांत बळी गेला आहे. तर एक अपघाती मृत्यू इतर प्रकारात मोडणारा आहे.
१ जानेवारी ते ३० एप्रिल यादरम्यान गोव्यात एकूण ७९७ अपघातांची नोंद झाली असून त्यात ७१ जण गंभीर जखमी तर १६५ जण किरकोळ जखमी झाले होते. ४७७ अपघात असे आहेत की, ज्यात कुणाला कुठलीही दुखापत झालेली नाही. मात्र असे असले तरी २०२४च्या तुलनेत गोव्यातील यंदाचे अपघातांचे प्रमाण कमीच आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८.७६ टक्क्यांनी घट झाली आहे. मृतांच्याही बाबतीत तीच स्थिती असून जानेवारी ते एप्रिल या काळात ११३ जणांना मृत्यू आला होता. तर यंदा पहिल्या चार महिन्यांत रस्त्यांवरील अपघातांचे बळी ८७ एवढे आहे. टक्केवारीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ती २३.०१ टक्क्यांनी कमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.