
सासष्टी: गेल्या आठ दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण गोव्यातील अनेक भागातील शेत जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
गत दोन दिवसांपासून जरी पाऊस कमी झाला असला तरी शेतांमध्ये साठलेले पाणी सुकलेले नाही व शेतकऱ्यांना कापणी करणे किंवा खत घालणे किंवा इतर कामे करणे अशक्य झाले आहे. वेळ्ळी येथील महिला शेतकरी गिरदोलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, या भागात कमीत कमी १०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वेळ्ळी इथे बांधलेला बांध मोडलेला आहे व तो दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. येथील तळ्यातील पाणीही शेत जमिनीत सोडले आहे व पंचायत किंवा सरकार काहीच उपाययोजना करीत नाही असे त्यांनी सांगितले.
सरकार शेतजमीन लागवडीखाली आणा असे सांगते व दुसऱ्या बाजूने मदत करण्यास पुढे सरसावत नाही. काही शेतकऱ्यांनी एका महिन्यापूर्वी जमीन कसली होती व बियाणे पेरले होते. एका महिन्याने रोपट्यांना पालवी फुटली होती व कापणी करण्याचे बाकी होते, पण पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले आहेत.
आमदार क्रुझ सिल्वांकडून शेत जमिनीची पाहणी
वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कृषी खात्याकडे केली आहे. त्यांनी विभागीय कृषी अधिकारी राजेश दा कॉस्ता व सहाय्यक रांजेल सिल्वा यांच्या समवेत वेळ्ळी भागातील शेत जमिनीचा पाहणी केली. जवळ जवळ ६० हजार चौरस मीटर शेत जमीन पाण्याखाली गेल्याने ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसान भरपाई तुटपुंजी!
कृषी खाते जी नुकसान भरपाई देते ती पुरत नाही, असे आंबावली येथील शेतकऱ्याने सांगितले. यंदा सिंचनासाठी कालव्यातील पाणी सोडण्यास उशीर करण्यात आला. आम्हाला शेत जमीन तयार करण्यासाठी त्यामुळे उशीर झाला. जलस्रोत खात्याने डिसेंबर, जानेवारीपर्यंत पाण्याची व्यवस्था केली तर मेपर्यंत पीक होऊ शकते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.