
पणजी : राज्यात दहा-बारा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ३५ शाळांची दुरुस्ती कामे रखडली आहेत. त्यामुळे या शाळा ४ जूनपासून सुरू होणार की काही दिवस उशिराने, याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सोमवारी बैठक घेण्यात आली. तीत सद्यःस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व शिक्षण संचालनालयाला सादर केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारेच दुरुस्तीसाठी काढलेल्या शाळा वेळेत सुरू करता येणार की नाहीत, याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी उघडलेल्या या शाळांमध्ये जोरदार पावसामुळे वर्गखोल्यांचे नुकसान होऊन कामे ठप्प झाली होती. काही भागात काम पुन्हा सुरू होऊन पूर्ण झाले असले, तरी उर्वरित शाळा वेळेत सुरू होतील का, याबाबत अनिश्चितता आहे. अनेक शाळांमध्ये गळती, भिंतींचे अपूर्ण रंगकाम, बाथरूम आणि वॉटर सप्लायची कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
याबाबत बोलताना शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक शाळा चकचकीत करण्याची सूचना केली होती. त्यासाठी तालुकास्तरावर एडीआयला अभियंते नियुक्त करण्याचे अधिकार दिले गेले होते. शाळांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. पुढील दोन दिवसांत ही कामे पूर्ण होतील.
राज्यातील सर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळा ४ जूनपासून सुरू होतील. एकाही शाळेकडून अद्याप शाळा उशिरा सुरू करण्याची विनंती आलेली नाही. आम्ही सुमारे ३५०० नवीन बेंच राज्यभर वितरित केले आहेत. - शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक
दुरुस्ती सुरू असलेल्या शाळांच्या सद्यःस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालनालयाला सादर केला जाणार आहे. शाळा वेळेत सुरू होण्यायोग्य आहेत की नाहीत, याचा निर्णय स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच होईल. - श्रीवल्लभ पै, मुख्य अभियंता (साबांखा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.