

सासष्टी: केळशी समुद्रकिनारा हा सासष्टी तालुक्यातील देखणा किनारा असून कित्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आकर्षित होत असतात. शिवाय केळशी भागात कित्येक पंचतारांकित हॉटेल्स असल्याने तिथे पर्यटकांची वर्दळ असते. मात्र हल्लीच्या दिवसांत तेथील शौचालयांची स्थिती दयनीय झाली आहे.
शौचालये सध्या या भागात महत्त्वाची असून सरपंच डिक्सन वाझ यांनी यासंदर्भात पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांना पत्र लिहिले असून त्यांनी त्या पत्राची दखल घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकार किनारपट्टीतील साधनसुविधांवर जास्त खर्च करीत नाही, असे वाझ यांचे म्हणणे आहे. शिवाय किनारपट्टीवरील स्वच्छतेला जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे. पंचायतमार्फत आम्ही आमच्या परीने काही प्रमाणात त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतो; पण आर्थिक दृष्ट्या जास्त खर्च पंचायतीला परवडत नाही, असे वाझ यांनी सांगितले.
आम्ही दर आठवड्याला किनारपट्टीवर फेरफटका मारतो व साधनसुविधांची पाहणी करतो. केवळ केळशीमध्येच नव्हे तर सासष्टीतील सर्व किनारपट्टीवरील शौचालयांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, असे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले. आम्ही सरकारला भरपूर निधी गोळा करून देतो; मात्र त्याच्या उलट येथील विकासासाठी पंचायतीला जास्त काही मिळत नाही, असेही वाझ यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.