
पणजी: पर्वरीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाचा सेगमेंट कोसळण्याची घटना रविवारी घडली. या घटनेत कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाल्याचे उघड होत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचा संपूर्ण अपयश समोर आले आहे. कामाविषयी गंभीर नसलेल्या कंत्राटदारावर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की स्लॅबचा सेगमेंट कोसळणे ही काही किरकोळ गोष्ट नाही. राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गावर हा पूल उभारला जात आहे. त्या मार्गावरून दररोज हजारो वाहनांचा प्रवास होतो. अशा पुलाच्या कामाबाबत तडजोड करणे हे जनतेच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या कामातील अपयशाविषयी कोणाला जबाबदार धरले जाईल का?, स्लॅब कोसळल्यानंतर सुरक्षेविषयी लेखापरीक्षण झाले आहे का?, हा पूल पूर्ण झाल्यावर सार्वजनिक वापरासाठी सुरक्षित आहे का?, सरकार प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देणार का, की एखाद्या अपघाताची वाट पाहणार? असे प्रश्न पणजीकर यांनी उपस्थित केले आहेत.
याशिवाय याप्रकरणी कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या घटनेवर उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी व्हावी आणि अहवाल जनतेसमोर सादर करावा, ज्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला, अशा सर्वांवर फौजदारी कारवाई करावी आणि पूल सुरू ठेवण्यापूर्वी किंवा खुला करण्यापूर्वी तृतीय-पक्ष लेखापरीक्षणासह जनतेला सुरक्षिततेची हमी द्यावी, अशा मागण्याही त्यांनी या पत्रकात केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.