
श्रीनगर: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे ५० हून अधिक नागरिक श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये सुरक्षित आहेत. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा गोव्यातील दोन गट पेहलगाममध्ये होते त्यांना गोव्यात परत आणण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३ एप्रिल) रोजी दिली.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि.२२ एप्रिल) रोजी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात बहुतांश पर्यटक असलेले किमान २६ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममधील बैसरनच्या गवताळ प्रदेशात फिरणाऱ्या आणि आनंद घेण्यासाठी जमलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
या घटनेनंतर पहलगाम आणि इतर ठिकाणांहून सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये हलवण्यात आले असल्याची माहिती गोवा सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलीये.
गोव्याचे ५० हून अधिक नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत आणि ते सर्व सुरक्षित असून त्यांना लवकरच परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गोव्यातील टूर ऑपरेटर्सही सर्व पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरमधून परत आणण्यासाठी नियोजन करत आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी जेवणानंतर काही पर्यटक बैसरन पॉईंटला भेट देणार होते, त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. पणजी येथील ऍडव्हेंचर क्लबकडून ३४ लोकांच्या एका गटासाठी पहलगाम आणि १२ लोकांच्या गटासाठी जम्मूच्या दौऱ्याचे आयोजन केले गेले होते.
"जे पर्यटक जम्मूमध्ये आहेत ते भूस्खलनामुळे तेथे अडकले आहेत. तसेच, विमानांमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना तेथून प्रवास करणेही शक्य होत नाही. पहलगामला गेलेला एक गट १७ एप्रिलला पोहोचला होता आणि त्यांना २४ एप्रिलला परत यायचे होते. त्यांना तातडीने परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असे कंपनीचे सह-संस्थापक अहरज मुल्ला यांनी सांगितले.
शिवाय पणजीमधील ट्रॅव्हल बग टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत आयोजित टूरमधील २६ लोकं अजूनही काश्मीरमध्ये अडकली आहेत. "त्या सर्वांना श्रीनगरमधील हॉटेल्समध्ये पोहोचवण्यात आले आहे. आम्ही त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत," अशी माहिती कंपनीच्या मालकांनी दिली.
गोव्यातील काही पर्यटक जेवण करत असताना हा दुर्दैवी हल्ला झाला, जिथे काही वेळांतच ते भेट देणार होते. जम्मू आणि काश्मीरमधून येणाऱ्या विमानांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे टूर ऑपरेटर्सना पर्यटकांना तेथील हॉटेल्समध्ये ठेवावे लागले आहे, असा दावा ट्रॅव्हल बग टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक नाईक यांनी केलाय आणि शक्य तितक्या लवकर विमानाने या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.