
जुने गोवे हा पुरातन वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेला भाग.सतत होते. जगभरांतील पर्यटक तेथे भेट देत असतात. तर या वारसास्थळ परिसरांतील एक बंगला गेली दोन अडीच वर्षें सतत चर्चेत येत असतो. वारसास्थ परिसरांतील तें बांधकाम बेकायदेशीर आहे व म्हणून ते जमीनदोस्त करावे, अशी मागणी हल्लीच विधानसभेतही झालेली आहे. यापूर्वी या बांधकामावरून राजकीय नेत्यांनी उपोषणेही केलेली आहेत व नंतर ते प्रकरण उच्च न्यायालयातही गेलेले आहे. तरी पण परत जी मागणी होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण सरकार तेथे कोणतेच बांधकाम झाले नसल्याचे सांगत आहे तर विरोधक कायद्याला वाकुल्या दाखवून ते झाल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे खरेच बांधकाम झालेले असेल तर हल्लीच जे नवे विधेयक संमत केले गेले आहे त्याचा आधार घेऊन हे बांधकाम कायदेशीर करण्याचा तर कोणाचा डाव नसेल ना असा संशय आता लोकतांना येऊ लागला आहे. ∙∙∙
गोव्यात उद्यापासून गोवा चित्रपट महोत्सव होत आहे. गोमंतकीय चित्रपट निर्मितीला चालना मिळावी. सिनेसंस्कृती गोव्यात रुजावी, हा या महोत्सवामागचा हेतू आणि उद्दिष्ट होते. त्यानुसार पूर्वी बहुतांश चित्रपट आणि त्याच्याशी निगडीत तंत्रज्ञ, कलावंत गोमंतकीय असायचे. मात्र, यंदाच्या चित्रपट महोत्सवाची पत्रिका पाहता ८५ टक्के राज्याबाहेरील आणि केवळ १५ टक्के गोव्यातील तंत्रज्ञ, कलावंतांचा समावेश असल्याचे दिसून येते. अमुक एका विशिष्ट निर्मात्याला झुकते माप देण्यासाठीच हा खटाटोप तर नाही ना?, असा प्रश्न गोव्यातील सिनेकर्मींना पडला आहे. ∙∙∙
फोंड्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने भर रस्त्यावर घातलेला धिंगाणा चांगलाच व्हायरल झाला आहे. मुख्य रस्त्यावर या विद्यार्थ्यांनी चारचाकी वाहनात बसून जोरजोरात आरडाओरड करीत आणि कर्णकर्कश संगीताच्या तालावर घातलेला गोंधळ इतरांना धोकादायक ठरला होता. फोंड्यात मुख्य रस्त्यावर विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्यात जमा असून पोलिसांचा सध्या वचक नसल्याने असे प्रकार होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विशेष म्हणजे नंबरप्लेट नसलेल्या वाहनातून हा गोंधळ घालण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी चालत्या गाडीच्या समोरील भागावर बसून तर काहीजणांनी गाडीच्या खिडकीतून बाहेर अर्धे अधिक अंग बाहेर काढत घातलेला गोंधळ म्हणजे हीच काय ती सुशिक्षित आणि सुसंस्कृत युवा पिढी आहे काय, असा सवालही फोंडावासीयांनी केला आहे. ∙∙∙
पालिका व पंचायती लोकांच्या हिताकरता, असतात,किंबहुना असायला हव्यात. पण फोंडा पालिकेचा कारभार अजबच. आजचे उदाहरण घ्या. फोंडा पालिकेचे सध्या बाजारात गटार उपसण्याचे काम सुरू आहे. आता पावसाळ्यात हे काम का, हा भाग वेगळा. पण आज बाजारात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. एका नागरिकाच्या घराच्या गेटसमोरच्या गटारीवरच्या लाद्या काढण्यात आल्या आणि वेळ झाली म्हणून सांगून त्या तशाच टाकून पालिकेचे कामगार निघून गेले. घरच्या मालकाने आपल्याला गाडी काढायला मिळणार नाही, असे सांगूनही ते गेले ते गेलेच. पालिकेच्या सुपरवायझरनेही काही न ऐकता तिथून पोबारा केला. नगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यांना फोन केल्यास त्यांचे बघतो हे उत्तर. पालिकेची ही कमाल पाहून बाजारातील लोकही पालिका लोकांसाठी आहे की, लोकांना त्रास देण्यासाठी, असे विचारू लागलेत. काहींना तर ही पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मुजोर वृत्ती पाहून ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ हे गाणे आठवू लागले. तो बाजारात चर्चेचा विषय ठरला असला तरी ज्याचे जळते त्यालाच कळते, अशी त्या घरमालकाची अवस्था झाली, हे मात्र खरे! ∙∙∙
पर्वरीत उड्डाणपूल उभा राहतोय – तेजस्वी, भव्य, दिव्य! पाहताक्षणी वाटावं, गोवा लवकरच दुबईला टक्कर देणार! पण या चमचमत्या स्वप्नांच्या पायथ्याशी मात्र खड्ड्यांचं साम्राज्य फोफावतंय – अगदी शांतपणे, खालून सगळं पोखरत! उड्डाणपुलाखालचा जुना रस्ता ‘खड्ड्यांत हरवलेला रस्ता’ आहे. वाहनचालकांना वाट लागत नाही, रस्ता कुठं संपतो अन् खड्डा कुठं सुरू होतो, हे कळत नाही. पावसात तर हा रस्ता खड्डा आहे की तलाव – हे ओळखण्यासाठी स्वतंत्र जीपीएस लागेल. ∙∙∙
पणजी हे गोव्याचे राजधानीचं शहर – प्रशासनाचं केंद्र, पर्यटनाचं आकर्षण, आणि वाहनचालकांसाठी... ‘पार्किंग शोधा’ ही रोजची कोंडीची स्पर्धा! पाच मिनिटांच्या कामासाठी शहरात गेलं की, प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त वेळ पार्किंगसाठी जागेच्या शोधासाठीच जातो. एखादं दुकान, कार्यालय, बँक गाठायचं म्हटलं की, आधी मनात प्रार्थना – ‘कुठं तरी जागा सापडू दे!’ एकेक गल्लीत डोकावावं, दुसऱ्या फेरीत पुन्हा त्याच गल्लीचा फेरफटका, ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेला चुकवून दुचाकी ला झाडामागं लपवण्याचा प्रयत्न... आणि हे सारं केवळ ‘पाच मिनिटांचं काम आहे हो!’ या निरागस वाक्यासाठी! शहर नियोजन करणाऱ्यांना कदाचित वाटत असावं, ‘पार्किंग हवंय? मग कारने येण्याची गरजच काय? ‘किंवा, ‘तुमचं पाच मिनिटांचं काम, आमच्यासाठी पार्किंग पाच तासांचं दुःस्वप्न!’ कधी कधी वाहन घेऊन येणाऱ्यांना वाटतं, पणजीत पार्किंग मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे. कारण पार्किंगला जागा मिळाल्याचा कोण आनंद होतो. कारण जागा मिळताच काम विसरून आनंद साजरा करावा, असं वाहनचालकाला वाटतंच ! थोडक्यात, पणजीत कामा आधी ‘जागा’ शोधा, आणि नशीब बलवत्तर असेल तर आणि तरच ‘गाडी’ थांबवा. ∙∙∙
गोव्याची सीमा महाराष्ट्राशी मिळते ते गाव पत्रादेवी. इथं आलं की वाटतं, एखाद्या तपासणी महाकुंभात प्रवेश केला आहे! पोलिसांचे नाके आहेत, अबकारी, वाहतूक विभागही सज्ज आहे, आणि पशुवैद्यकीय खातंही हजर आहे. वनखातंही झेंडा फडकवतं. एकूण काय, तर गोव्यात यावं तर पाच तपासण्या पार कराव्या लागतात – एखाद्या परीक्षेसारख्या! मात्र या साऱ्या यंत्रणांचं लक्ष आहे ते राष्ट्रीय महामार्गावरच्या सुळसुळाटाकडे. पण जुन्या रस्त्याने जो येतो, तो काय विमानाने येतो का? तिकडं कोणाचंच लक्ष नाही. तपासणी नाके म्हणजे केवळ उघड्या डोळ्यांनी झोपणं याचा क्लासिक नमुना इथे दिसतो. महामार्गावर एकदा हल्ला झाला, म्हणून तपासणी नाके जरा लवाजम्यात लागले – पण जुन्या रस्त्यावर सुतकी शांतता! म्हणजे एकीकडे श्वानगण, दुसरीकडे दार उघडं ठेवून झोपा – अशीच ही व्यवस्थेची अवस्था. पत्रादेवी ही तपासणी नाक्यांची राजधानी झाली असली, तरी जुन्या रस्त्यावर मात्र ‘सगळं माफ’ हीच सध्याची अनौपचारिक पॉलिसी दिसते! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.