

सासष्टी: गेल्या २५ दिवसांपासून ‘नीट’ पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे या आंदोलनाला यश मिळाले असून, हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या अंताची ही सुरुवात आहे, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
या आंदोलनातून विद्यार्थ्यांची, विशेषतः ‘जेन झी’ची खरी ताकद सरकारला दिसून आली, असेही ते म्हणाले. काँग्रेसतर्फे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मडगावात पाठिंबा देण्यासाठी शांततापूर्ण मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या मोर्चाचे रूपांतर विजयोत्सवात झाले.
देशातील शिक्षण व्यवस्थेची अधोगती थांबविण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असल्याचे युरी आलेमाव यांनी नमूद केले. काँग्रेसच्या मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘आम्ही देशाचे शत्रू आहोत का?’ असा सवाल त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे नेते आसीस नोरोन्हा, प्रतिमा कुतिन्हो आणि अर्चित नाईक यांचाही सहभाग होता.
अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आषाढी एकादशीच्या शुभदिनी न्यायाचा विजय झाला आहे, असे मत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यानंतर इतर विरोधी पक्षांनीही त्यास पाठिंबा दिला.
सर्व स्तरांतून सरकारविरोधात आंदोलने सुरू झाल्याने प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ‘एकादशीच्या या शुभप्रसंगी न्यायाचा विजय झाला आहे. यातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, सत्याला त्रास दिला जाऊ शकतो; मात्र, त्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही,’ असेही अर्चित नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.