
पणजी : नारळावर मंथन करणाऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन उद्या (ता.१०) गोमन्तक, गोवा सरकार व देशातील एकमेव कृषी वर्तमानपत्र असलेल्या ॲग्रोवनच्या सहकार्याने केले आहे. दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सकाळी १० वाजता करणार आहेत.
या परिषदेला राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक, महाराष्ट्राचे कृषिमंत्री भरत शेठ गोगावले, कर्नाटकचे कृषिमंत्री एन. चलूवरयस्वामी, तमीळनाडूचे कृषिमंत्री एमआरके पनीरसेल्वम, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, जुने गोवेच्या केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. परवीन कुमार उपस्थित राहतील.
नारळाचे उत्पादन किनारी भागात बहुतांशपणे आहे. नारळाचे उत्पादन घटते आहे आणि नारळापासून विविध उत्पादनेही आता तयार होऊ लागली आहेत. नारळ हा किनारी भागातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने नारळाची वाढती किंमत हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरतो. अलीकडे नारळाचे वाढलेले भाव आणि त्याची कारणमीमांसा शास्रीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय परिषदेत करण्यात येणार आहे.
नारळ या विषयाशी संबंधित सर्वजण म्हणजे बागायतदार, उद्योजक, प्रक्रिया करणारे, संशोधक, कृषी विद्यार्थी, व्यापारी सारेजण एका छताखाली एकवटणार आहेत. नारळ उत्पादन वाढीसाठी नवी दिशा शोधण्याचा प्रयत्न दिवसभरातील विचार मंथनातून केला जाणार आहे.
माडांची बागायत उभी करणाऱ्यांचे प्रश्न आणि त्या अनुषंगाने विद्यापीठ पातळीवर होणारे संशोधन यांची चर्चा एकाच मंचावर केली जाणार आहे. कोणत्या जातीचे माड लावले तर उत्पादन वाढू शकते, यावरील मते-मतांतरे यांची देवाण-घेवाणही या परिषदेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी संशोधन क्षेत्रात मानदंड निर्माण केलेल्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
‘एआय’चा वापर
तंत्रज्ञानविषयक बदलांना नारळ बागायतीत कसे सामावून घेता येईल, यावरही ऊहापोह करण्यात येणार आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’चा बोलबाला आहे. नारळ बागायतीत ‘एआय’चा वापर या विषयावरील स्वतंत्र चर्चासत्राचे नियोजन या परिषदेत आहे.
...या मान्यवरांचा परिषदेत सहभाग
नारळ उद्योगाचा विकास, नारळ प्रक्रियेचे तंत्रज्ञान, स्टार्टअपमधील अनुभवकथन अशा वैचारिक मेजवानीची तरतूद या राष्ट्रीय परिषदेत केली आहे. दिवसभर चालणाऱ्या या वैचारिक मंथनात डॉ. जे. आर. फालेरो, डॉ. आरती गावस, डॉ. अभिमान सावंत, सचिन दळवी, डॉ. वैभव शिंदे, डॉ. गौरीश करंजाळकर, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. राजन शेळके, डॉ. राजेश राठोड, डॉ. किरण मालशे, डॉ. अरुणाचलम, वैभव पवार, प्रगतिशील शेतकरी पांडुरंग पाटील, संशोधक मिंगेल ब्रागांझा, कृषी संचालक संदीप फळदेसाई, माजी संचालक ओर्लांडो रॉड्रिग्स आणि नेविल आफोन्सो आदी सहभागी होणार आहेत.
उत्पादनातील अडचणींवर तोडगा
माड बागायतीला दिली जाणारी खते, सिंचन व्यवस्था, आंतरपीक व्यवस्थापन यावरही तज्ज्ञांची मते ऐकण्याची संधी परिषदेत मिळणार आहे. माडावर येणाऱ्या रोगांचा नायनाट करण्यासाठी कोणती बुरशीनाशके, कीटकनाशके वापरावीत यावरही अचूक मार्गदर्शन याविषयीच्या चर्चेतून होणार आहे. नारळ आणि त्याच्याशी निगडीत बाजारात होत असलेले बदल, आव्हाने याची दखलही चर्चेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.