

पणजी: भंडारी समाजात जे समितीचे गट-तट निर्माण झाले आहेत, ते मिटविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. स्व.रवी नाईक यांच्या बंगल्यावर देखील अनेकदा बैठका घेण्यात आल्या. या दोन्ही समित्या रथोत्सवात आमच्यासोबत आहेत. परंतु हा वाद निकालात काढून समाज एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन श्री रूद्रेश्वर रथोत्सव समितीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.
ते पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ॲड. अमित पालेकर, श्री रूद्रेश्वर देवस्थान समितीचे यशवंत माडकर, अमरनाथ पणजीकर व इतर उपस्थित होते. दरम्यान मांद्रेकर म्हणाले, जर या समितीची निवडणूक प्रक्रिया चुकीची असेल तर ती रद्दबादल करत नव्याने निवडणूक घेऊन भंडारी समाजाच्या एकतेसाठी हा वाद मिटवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भंडारी समाजाचे आराध्य दैवत श्री देव रूद्रेश्वर याच्या आशीर्वादाने आज भंडारी समाज एकवटला आहे. आज अनेक कार्यक्रम होत आहेत परंतु ज्या दोन समित्यांमध्ये गट-तट निर्माण झाले आहेत ते मिटविण्यासाठी रथोत्सव वर्षपूर्ती कार्यक्रमानंतर बैठक घेऊन सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री देव रूद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी सांगितले.
श्री देव रूद्रेश्वर रथोत्सव समितीत भंडारी समाजाचे विविध पक्षाचे नेते आहेत, परंतु समाजाचे कार्य करताना कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्ही आणले नाही. आजच्या भंडारी समाजाची तरूणाई समाजाच्या व्यासपीठावर एकत्र येत आहे, ते गट-तटात अडकत नाहीत, ही समाधानाची गोष्ट असून येत्या काळात हे वादही मिटतील, असे ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.