
Sanquelim Fire Incident: साखळी नगरपालिका बाजारातील काढा मार्केटमध्ये असलेल्या 44 दुकानांपैकी तीन दुकानांना सोमवारी (22 सप्टेंबर) रात्री उशिरा आग लागल्याने तीनही दुकानांचे मोठे नुकसान झाले. पैकी रुपेश काणेकर यांचे मसाला व किराणा दुकान पूर्णपणे आगीत बेचिराख झाले असून त्यांचेच सुमारे 40 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेजारीच असलेल्या सुभाष परब यांच्या कपड्याच्या दुकानांमध्येही आग घुसल्याने मोठ्या प्रमाणात कपडे आणि फर्निचर जळून खाक झाले.
त्यामुळे त्यांचे सुमारे 15 लाखांचे तर बाजूला असलेल्या राजेंद्र पांगम यांच्या लहानशा कोल्ड्रिंक मध्येही आग (Fire) घुसून त्याही दुकानाचे नुकसान झाले आहे. एकंदरीत या घटनेत सुमारे 60 लाखांची नुकसानी झाली असून या आगीच्या घटनेची कारणे शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वीज खात्याच्या अभियंत्यांना दिले आहेत.
दरम्यान प्रथमदर्शनी सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असून या मार्केट प्रकल्पाला पुरविण्यात आलेल्या वीज पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात अनियोजितपणा असल्याने सदर शॉर्टसर्किट झाल्याचे मत या बाजारातील दुकानदारांनी व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी उशिरा रोजी रात्री बाजारातील दुकानदार आपली दुकाने बंद करुन गेल्यानंतर रात्री 1 वा. च्या सुमारास बाजारातून धूर येत असल्याचे बाजारातच वास्तव्य करणाऱ्या काही युवकांनी पाहिले. या धुराच्या दिशेने येऊन पाहिले असता काढा मार्केटमधील रुपेश काणेकर यांच्या दुकानातून धूर येत होता व शटर लाल झाल्याचे त्यांनी पाहिले. लगेच या घटनेची माहिती त्यांच्या समोरीलच दुकानदार संदीप काणेकर यांना देताच संदीप काणेकर व त्यांचे पुत्र संजय संदीप काणेकर घटनास्थळी दाखल झाले.
बाजारात येताच त्यांनी रुपेश काणेकर यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच रुपेश काणेकर हे लागलीच बाजारात दाखल झाले. त्यांनी दुकानातून येत असलेला धूर पाहून दुकानाची कृपे खोलली व कसेबसे दुकानाचे शटर उघडले. शटर उघडताच आतून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ बाहेर पडले.
याचवेळी आगीने आत असलेल्या झाडूंना पेट घेतला होता. हे झाडू काढण्याचा प्रयत्न करत असतानाच आग दुकानातील अन्य सामानांमध्ये फैलावली. या प्रयत्नात रुपेश काणेकर यांचे दोन्हीही हात बऱ्यापैकी आगेने भाजले. तरीही त्यांनी आतील सामान बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तो आगीच्या रौद्ररुपामुळे फोल ठरला. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या वेळीच नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, नगरसेवक आनंद काणेकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
बाजारामध्ये आग लागल्याचे समजतात तत्काळ जमलेल्या अवघ्या सहा ते सात जणांनी या आगीवर आपल्या परीने नियंत्रण मिळवण्यासाठी जवळ असलेल्या बॅरलमध्ये किंवा स्वच्छतागृहातून पाणी आणून आगीवर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे स्वरुप एवढे होते की, दुकानाच्या जवळ जाणेही कठीण बनत होते. या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलाला दिल्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांनी अग्निशामक दलाचा बंब साखळी बाजारात दाखल झाला.
दलाच्या जवानांनी अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच बचाव कार्याला सुरुवात केली. पाण्याची फवारणी सुरु करुन आगीला नियंत्रणात आणण्याचा मोठा प्रयत्न केला. या कामात डिचोली (Bicholim) अग्निशामकच दलाचे दोन बंब तर वाळपई अग्निशामक दलाचाही एक बंद पाचारण करण्यात आला होता. एकूण तीन बंब खाली करुन या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.