

म्हापसा: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने, म्हापसा शहरातील खोर्ली भागातील नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे ऐन होळीच्या काळात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने स्थानिकांनी सण साजरा करायचा की पाण्यासाठी वणवण करायची, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
ऐन सणाच्या दिवसांत नळ कोरडे पडल्याने, खोर्लीतील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकर्सवर अवलंबून राहावे लागले, किंवा लांबून पाणी आणण्याची कसरत करावी लागली.
यासंदर्भात, प्रभाग १४ चे स्थानिक नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी पाणीपुरवठा विभागाकडे जाब विचारला असता, ''व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड'' असल्याचे कारण देण्यात आले. बुधवारी संध्याकाळपर्यंत पाणी सोडले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, अशा आश्वासनांमुळे नागरिकांमध्ये संताप असल्याचे ते म्हणाले.
चतुर्थी असो, दिवाळी असो किंवा उन्हाळा, पाणीपुरवठा विभाग नेहमीच नवनवीन सबबी शोधण्यात पटाईत झाला आहे. सणासुदीच्या काळातही जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते, हे दुर्दैवी आहे. पाईपलाईन फुटली की ''माणसे कमी आहेत'' असे सांगितले जाते. रस्त्यावर एखादा बिघाड झाला की ''साहित्य नाही'' किंवा ''निधी नाही'' अशी कारणे देऊन विभाग आपली जबाबदारी झटकतात, असेही नगरसेवक राऊळ म्हणाले.
याविषयी माजी नगरसेवक नारायण राटवड म्हणाले की, ऐन सणासुदीच्या दिवसांत लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यास, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. सणासुदीच्या काळात देखभालीची कामे आधी का केली जात नाहीत, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो. हा ढिसाळपणा लोकांच्या आनंदावर एकप्रकारे विरजण घालण्यासारखे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.