

वास्को: खारीवाडा येथील मच्छिमार बोटमालक मंजुनाथ हरिकांत (५५) यांच्या मृत्यूप्रकरणी आगशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. मंजुनाथ यांच्या मच्छिमारी बोटीवर काम करणाऱ्या दोन कामगारांवर संशयाची सुई असल्याने त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. मंजुनाथ यांचा मृतदेह सापडल्यानंतर आगशी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, शवविच्छेदन अहवालात मंजुनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंदविले आहे. मंजुनाथ हे गेली अनेक वर्षे खारीवाडा येथे एका खोलीत राहत होते. त्यांची बहीण पूर्वी त्यांच्यासमवेत राहत होती. तिचे लग्न झाल्यानंतर मंजुनाथ एकटेच राहत होते. त्यांच्याकडे दोन मच्छिमार बोटी होत्या. त्यापैकी एक त्यांनी विकल्याचे समजते. सध्या एका मच्छिमार बोटीच्या साहाय्याने ते मासेमारी करीत होते.
तीन दिवसांपूर्वी ते खारीवाडा फिशिंग जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत दोन कामगार होते. पाच-सहा तासांनंतर ती बोट धक्क्यावर नांगरण्यात आली होती. त्या बोटीवर काम करणारे कामगारही आपल्या खोलीतील साहित्य घेऊन तेथून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशीही ती बोट धक्क्यावर तशीच उभी असल्याने, तसेच त्यातील मासे कावळे खात असल्याचे पाहून काहीजणांनी मंजुनाथ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे मंजुनाथ नेमके कुठे गेले, याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आगशी येथे झुआरी नदीत एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यावर येथील काही मच्छिमार तेथे गेले. त्यावेळी तो मृतदेह मंजुनाथ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. आगशी पोलिसांनी सुरुवातीला अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.
शवविच्छेदनानंतर चित्र स्पष्ट झाल्याने मंजुनाथ यांचा मृत्यू खून म्हणून नोंदविण्यात आला आहे. संबंधित कामगारांनी गुपचूप पळ काढल्याने त्यांनीच मंजुनाथ यांचा खून केल्याची चर्चा आहे. मासेविक्रीनंतर मिळणारे पैसे मंजुनाथ मासेमारीला जाताना आपल्यासमवेत नेत असत. त्यामुळे त्या दिवशी त्यांच्याकडे असलेली रक्कम हस्तगत करण्यासाठी त्यांना मारहाण करून खून करण्यात आला असावा आणि त्यानंतर मृतदेह समुद्रात टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मासेमारी बंदी सुरू होणार असल्याने खारीवाडा जेटीवरील वर्दळही कमी झाली होती. त्याचा फायदा त्या दोन्ही कामगारांना मिळाला. त्यांना हटकणारे तेथे कोणी नसल्याने त्यांना सहजपणे पळ काढता आला. आगशी पोलिस त्या कामगारांचा शोध घेत आहेत. त्या कामगारांची पडताळणी वास्को पोलिस स्थानकात करण्यात आली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पडताळणी झाली असल्यास ते कामगार हाती लागण्यास मदत होईल, अशी चर्चा आहे.