
पणजी: भाजपचे नेते २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २७ जागांचे लक्ष्य ठेवले असल्याचे सांगतात, ते ‘२७ मध्ये २७’ असा नारा देत आहेत, यावरून काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजप नेते ‘४० च्या ४०’ जागा का सांगत नाहीत, १३ जागा कोणासाठी सोडलेल्या आहेत, असा उपरोधिक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर काही महिन्यांतच भाजपात गेलेल्या आठ आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटाच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्यातील सहा मतदारसंघातील बैठका झाल्या असून, उर्वरित दोन बैठका उद्या (मंगळवारी) होतील. या बैठकांतून गोव्याला भाजपच्या कुशासनातून मुक्त करण्यासाठी २०२७ मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा आमचा निर्धार असल्याचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
गोवा दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी आज रविवारी कळंगुट येथील काँग्रेस गट समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. बैठकीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकांद्वारे कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व धर्मीय कार्यकर्त्यांना घेऊन बुथ मजबूत केला जाईल. जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवू आणि चांगला निकाल देऊ, अशी अपेक्षा आहे.
ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्यानंतर भाजप खाणी सुरू करणार असल्याचे आश्वासन देते. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असून, आम्ही बुथ स्तरावरून जिल्हास्तरावरील संघटन मजबूत केले जाईल. गेल्या निवडणुकीनंतर आठ आमदार भाजपात गेले आहेत, त्यांना काँग्रेसचे दरवाजे बंद आहेत. जे माजी आमदार आहेत, त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेल तर त्यांना पुढे आणले जाईल. प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते मजबूतपणे पक्ष पुढे नेणार असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे त्यांच्यातूनच उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.