
मडगाव : हॉस्पेट ते वास्को या दरम्यान दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर केवळ या मार्गानेच कोळशाची वाहतूक होईल, अशा भ्रमात लोक राहिल्यास ती गंभीर चूक ठरेल, असा इशारा ‘गोंयचो एकवोट’ या संघटनेचे सरचिटणीस ऑलेन्सिओ सिमॉईश यांनी दिला आहे.
गोमन्तक टीव्हीच्या ‘साश्टीकार’ या कार्यक्रमात बोलताना सिमॉईश यांनी सांगितले की, गोव्यात उतरविला जाणारा कोळसा फक्त कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रातही जाणार आहे. २०१६ मध्ये मुरगाव बंदराचा जो विस्तार आराखडा तयार झाला, त्यात महाराष्ट्रातील वाहतुकीचाही स्पष्ट उल्लेख आहे.
त्यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गानंतर कोकण रेल्वेचेही दुपदरीकरण सुरू होणार असून या मार्गानेही कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होईल. साहजिकच उत्तर गोवासुद्धा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
कोळसा प्रकल्प लपवण्यासाठी पर्यटन वृद्धीचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप सिमॉईश यांनी केला. रेल्वे कोणत्याही परिस्थितीत हा विस्तार प्रकल्प पूर्ण करणार असून राज्य सरकारलाही दबावाखाली आणले आहे, असे ते म्हणाले.
मुरगाव बंदरात भविष्यात कोळशाची हाताळणी प्रचंड प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुरगाव तालुका धोक्याच्या छायेत येणार आहे. या विध्वंसापासून गोव्याला वाचवायचे असेल तर एकत्र येऊन विरोध करावा लागेल. लवकरच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून राष्ट्रीय हरित लवादासमोर आधीच मुरगाव बंदर विस्ताराला आव्हान देण्यात आले आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे सिमॉईश म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.