

पणजी: गोव्याच्या ताब्यातील १६ बेटे बळकावू पाहणाऱ्या कर्नाटकने आता ‘त्या’ बेटांवर पर्यटन विकास करण्यासाठी, तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या संवर्धनासाठी साडेआठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेला सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारवारला भेट देऊन परिसराची पाहणी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
कर्नाटकने ही बेटे बळकावू नयेत, यासाठी गोवा सरकारने तेथे पाहणी करण्याकरिता अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्याचे ठरवले होते. मात्र, ते पथक पाठवण्यासाठी गोवा सरकारला मुहूर्तच न मिळाल्याने आता कर्नाटकने डाव साधला आहे. म्हादईचे पाणी पळवल्यानंतर कर्नाटकाने बेटांवर डल्ला मारला आहे. पर्यटनदृष्ट्या या बेटांचा विकास करण्यासाठी कर्नाटकने कंबर कसली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त किनारपट्टी निर्माण करण्यासाठी म्हणून हा प्रस्ताव कर्नाटकने तयार केला असला तरी प्रत्यक्षात या प्रस्तावाच्या आडून १६ बेटांवर पर्यटन विकास केला जाणार आहे. जागतिक बॅंकेकडे ८५० कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव सादर केला आहे. किनारपट्टीवरील प्लास्टिक प्रदूषण रोखणे, समुद्रात कचरा जाण्यापासून प्रतिबंध करणे, समुद्रकिनारे स्वच्छ राखणे तसेच किनारी भागातील स्थानिक अर्थव्यवस्था आणि उपजीविका मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे भासवण्यात आले आहे.
एकूण निधीपैकी सुमारे ७० टक्के म्हणजेच ५८८ कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळावेत, अशी मागणी कर्नाटक सरकारने केली आहे. उर्वरित ३० टक्के म्हणजेच २५२ कोटी रुपयांचा खर्च कर्नाटक सरकार उचलणार आहे. या एकूण निधीपैकी उत्तर कन्नड जिल्ह्यासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध किनारपट्टी विकास आणि प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमांची अंमलबजावणी या निधीतून केली जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
उत्तर कन्नड जिल्ह्यात एकूण ६३ बेटे आहेत. पैकी १६ बेटे सध्या गोव्याच्या ताब्यात आहेत. ही बेटे पुन्हा कारवारकडे देण्यात यावीत, यासाठी कर्नाटकने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. नामकरणानंतर ही यादी केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे.
ही बेटे नैसर्गिक आपत्तींपासून कारवार किनाऱ्याचे संरक्षण करणाऱ्या ढालीसारखी काम करतात. चक्रीवादळ, वादळे किंवा त्सुनामीसारख्या प्रसंगी ही बेटे अडथळा ठरून किनाऱ्याचे नुकसान कमी करतात. खराब हवामानात खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी कारवार किनाऱ्यावर आश्रय घेतात.
ऐतिहासिक महत्त्व : या बेटांपैकी काहींना ऐतिहासिक महत्त्वही आहे. अंजदीव बेट येथे पोर्तुगीज जलप्रवासी वास्को द गामा यांनी पाऊल ठेवले होते. सध्या हे बेट भारतीय नौदलाच्या ताब्यात आहे. होन्नावर येथील बसवराज बेटावर ‘मिरीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चन्नभैरादेवी यांचे राज्य होते. तसेच सोंधा संस्थानच्या राजांनी कुर्मगड बेटांचा वापर समुद्रावर नजर ठेवण्यासाठी केला होता.
काही बेटे केवळ ओहोटीच्या वेळी दिसतात. त्यामुळे त्यांना लागून असलेल्या किनाऱ्यांवरून नावे देण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, देवगड परिसरातील बेटांना ‘देवगड १’, ‘देवगड २’ अशी नावे देण्यात आली आहेत. तसेच कुर्मगड बेट परिसरातील खडकाळ बेटांना ‘कुर्मगड १’ आणि ‘कुर्मगड २’ अशी नावे देण्यात आली आहेत. या बेटांपैकी काही पश्चिम घाट पर्वतरांगांचा भाग असून, सुमारे पाच ते दहा हजार वर्षांपूर्वीच्या होलोसीन कालखंडात समुद्रपातळी वाढल्याने ती पाण्याखाली गेली, असे प्रा. शिवकुमार हरगी (समुद्रजीवशास्त्र विभागप्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड) यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.