

पणजी: गोव्याच्या ताब्यातील १६ बेटांचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी आता कर्नाटक सरकारने कंबर कसली आहे. कारवारलगतच्या बेटांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे गोवा-कर्नाटक सीमावादाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अरबी समुद्रकिनाऱ्यावर कारवार व भटकळ परिसरात विखुरलेल्या अनेक लहान बेटांना पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रथमच अधिकृत नावे देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. ही प्रक्रिया उपायुक्त लक्ष्मी प्रिया यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त उपायुक्त साजिद अहमद मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवार परिसरात एकूण २४ लहान बेटे आहेत. त्यांची ओळख पटवून सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी सहा बेटांना स्थानिक मच्छीमारांमध्ये प्रचलित असलेल्या नावांवरून नावे देण्यात आली आहेत. उर्वरित बेटांना समितीमार्फत नावे देण्यात येणार आहेत.
या बेटांचे सर्व्हेक्षण ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आले असून, त्यांना स्वतंत्र महसुली क्रमांक देण्यात आले आहेत. ही सर्व बेटे महसुली जमीन असून एकूण सुमारे १०० हेक्टर क्षेत्र व्यापतात. नामकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पर्यटन विकासासाठी एकत्रित आराखडा तयार करून शासनाला अहवाल सादर केला जाईल. काही बेटे ओहोटीच्या वेळी दिसतात. त्यामुळे त्यांना लागून असलेल्या किनाऱ्यांच्या नावावरून ओळख देण्यात येत आहे. उदाहरणार्थ, देवगड परिसरातील बेटांना ‘देवगड १’ आणि ‘देवगड २’ अशी नावे देण्यात आली आहेत. तसेच कुर्मगड बेट परिसरातील बेटांना ‘कुर्मगड १’ आणि ‘कुर्मगड २’ अशी नावे देण्यात आलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर कन्नड जिल्ह्यात एकूण ६३ बेटे आहेत. त्यापैकी १६ बेटे सध्या गोव्याच्या ताब्यात आहेत. ही बेटे पुन्हा कारवारकडे देण्यात यावीत, यासाठी प्रशासनाने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. नामकरणानंतर बेटांची संपूर्ण यादी केंद्राकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे.
ही बेटे नैसर्गिक आपत्तींपासून कारवार किनाऱ्याचे संरक्षण करणाऱ्या ढालीसारखी काम करतात. चक्रीवादळ किंवा सुनामीसारख्या प्रसंगी ही बेटे अडथळा ठरून किनाऱ्याचे नुकसान कमी करतात. खराब हवामानात खोल समुद्रातील मासेमारी बोटी कारवार किनाऱ्यावर आश्रय घेतात.
या बेटांपैकी काही बेटांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. अंजदीव बेटावर वास्को द गामा यांनी पाऊल ठेवले होते. सध्या हे बेट भारतीय नौदलाच्या ताब्यात आहे. होन्नावर येथील बसवराज बेटावर ‘मिरीची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चन्नभैरादेवी यांचे राज्य होते. तसेच सोंदे संस्थानच्या राजांनी कुर्मगड बेटांचा वापर समुद्रावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी केला होता.
कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथील समुद्रजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवकुमार हरगी यांनी सांगितले की, या बेटांपैकी काही बेटे पश्चिम घाट पर्वतरांगांचा भाग होती. सुमारे पाच ते दहा हजार वर्षांपूर्वी होलोसीन कालखंडात समुद्रपातळी वाढल्याने ती पाण्याखाली गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.