Goa Election 2022: कॉँग्रेसची निकालापूर्वीच अतिघाई!

गोवा काँग्रेसचे निरीक्षक पी. चिदंबरम आणि प्रभारी गुंडुराव हे गोव्यात दाखल झाले
Goa Congress Party
Goa Congress Party Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोवा: निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसने सरकार स्थापनेची घाई सुरू केली आहे. गोवा काँग्रेसचे निरीक्षक पी. चिदंबरम व प्रभारी गुंडुराव हे गोव्यात दाखल झाले आहेत. म. गो. पक्षाला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर आम आदमी व संभाव्य अपक्षांना आपल्या गोटात आणण्याचे आराखडे मांडले जात आहेत. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सरकार बनवू द्यायचे नाही, हा हेतू त्यामागे आहे.

काँग्रेसने 15 जागा जरी जिंकल्या तरी ते म.गो. व अपक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापन करू शकतील, असे त्यांना वाटते आहे. त्यात यावेळी विधिमंडळाचे नेतृत्व कोण करणार? हा ही प्रश्न नाही. लुईझिन फालेरो व रवी नाईक काँग्रेसचे नसल्यामुळे नेतृत्व दिगंबर कामत यांच्याकडे जाणार आहे, हे उघडच आहे. मायकल लोबोची महत्त्वाकांक्षा ही बार्देश तालुक्यावर अवलंबून असणार आहे.

बार्देशात जर काँग्रेसने तीनहून अधिक जागा जिंकल्यास लोबो हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बनू शकतील, पण तरीही दिगंबर हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे व लोबो हे काँग्रेसमध्येच नव्याने आल्यामुळे दिगंबर यांनी मुख्यमंत्री बनण्याची अधिक संधी असल्याचे दिसते. मात्र लुईझिन जर काँग्रेसचे असते तर मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा तीव्र झाली असती, हेही तेवढेच खरे आहे. मागच्यावेळीही लुईझिनमुळेच काँग्रेसचा हाता तोंडाकडे आलेला सत्तेचा घास निसटला होता, पण आता खरा प्रश्न आहे, काँग्रेस सरकार स्थापन करू शकणार की नाही? कमी जागा मिळूनही भाजप तोडमोड करून सरकार बनवेल, असे आजही अनेकांना वाटते.

Goa Congress Party
मडगाव-नुवे पश्‍चिम बगलमार्ग काम पोलिस संरक्षणात पूर्ण करा

काँग्रेसला जर पंधरा-सोळा जागा मिळाल्यास काँग्रेस सरकार स्थापन करू शकेल, असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे जागा कमी मिळूनसुध्दा अपक्ष व मगोपमध्ये फूट पाडून भाजप सरकार बनवू शकतो, पण भाजपला दहापेक्षा कमी जागा मिळाल्यास मात्र सरकार स्थापन करणे मुश्कील होऊ शकते. तशी होण्याची शक्यता कमी आहे. भाजप कमीत कमी बारा तेरा जागा जिंकू शकतो, असे दिसते आहे. भाजपचीही व्यूहरचना सुरू आहे. गृहमंत्री अमितशहा यांनी तर पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपच सरकार बनविणार असे जाहीर करून टाकले आहे. काँग्रेसच्या रणनीतीची दाद द्यावी, तेवढीच थोडीच आहे.

तारीख दहा मार्चलाच संध्याकाळी 5 वाजता सरकार स्थापन करू अशी घोषणा मायकल लोबो यांनी केली आहे. काँग्रेसला जर 22-23 जागा मिळाल्या तर त्यांना देवसुद्धा सरकार स्थापन करण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. पण प्राप्त परिस्थितीत काँग्रेसला एवढ्या जागा मिळू शकेल, असे बिलकूल वाटत नाही. हे एवढे राजकारण सुरू असताना गोवा फॉरर्वडचे विजय सरदेसाई यांचे मौन मात्र खटकते. फातोर्ड्यात विजयाचे स्थान डळमळीत झाल्याचे बोलले जात आहे. याची परिणीती विजयाच्या मौनात झाली नसावी ना? असेच वाटते. पण काँग्रेसने जनतेचा कौल गृहीत धरून लगीनघाईला सुरुवात केली आहे हे विशेष. कोणत्याही पक्षाना बहुमत मिळणार नाही, असे संकेत मिळत असल्यामुळे शह काटशाहाच्या राजकारण्यांना तेजी येणार आहे.

Goa Congress Party
International Women's Day: आम्ही बी'घडलो, तुम्ही बी'घडा ना!

‘अभी नही, तो कभी नही’

काँग्रेसने आधीच ‘सर पे कफन’ बांधून रणनीती आखण्यास सुरुवात केली, असावी असेच दिसते. ‘अभी नही, तो कभी नही’ अशी सध्या काँग्रेसची स्थिती आहे. यावेळी काँग्रेस सरकार स्थापन करू न शकल्यास काँग्रेसची अधिकच शकले पडतील. ती एकत्र येणे कठीण होऊन जाईल. म्हणूनच त्याची ही निकालापूर्वीची लगीनघाई संयुक्तिक वाटते, पण ही लगीनघाई ‘शितापुढे मीठ’खाण्यासारखे तर ठरणार नाही ना? याचे उत्तर गुरुवारी सकाळी अकरावाजेपर्यंत मिळणार आहे हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com