

पणजी: राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान खात्याने 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान 'यलो अलर्ट' जारी केला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील दोन्ही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी बरसणार आहेत. या काळात राज्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.
दरम्यान, सत्तरी (Sattari) तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरुच असून कोपार्डे, म्हाऊस, आंबेली, नानोडा नगरगाव मार्गावर रस्त्यावर मोठी जंगली झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवरही झाडे पडल्याने धोका निर्माण झाला. मात्र, वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली.
या घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. कोपार्डे येथील जुन्या पोल्ट्री फार्मजवळील रस्त्यावर तसेच वीज वाहिन्यांवर गुलमोहराचे मोठे झाड कोसळून वीज वाहिनीचे मोठे नुकसान झाले.
दुसरीकडे, हवामान खात्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिक, पर्यटक आणि विशेषतः सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात मोठ्या आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी तसेच पर्यटकांनी या काळात समुद्रात न उतरण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला. अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी कामावर जाताना किंवा प्रवास करताना योग्य ती खबरदारी बाळगावी आणि हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.