मागील काही वर्षांतील निराशाजनक आकडेवारी पाहिल्यास 2050 पर्यंत पंधरा हजार नोकऱ्यांसह 100 टक्के सौर व अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न बोललेलेच बरे. अपयशी भाजप सरकार दिवास्वप्ने पाहत असताना गोमंतकीयांना वारंवार वीज कपात आणि प्रस्तावित वीज दरवाढीचा सामना करावा लागत आहे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.
मुख्यमंत्री सावंत यांनी 2050 पर्यंत गोवा राज्य सौर व हरित ऊर्जा हब म्हणून पुढे येईल असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आलेमाव यांनी अक्षय आणि हरित ऊर्जा निर्मितीबाबत भाजप सरकारच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले. माझ्या विधानसभेतील तारांकित प्रश्नांच्या उत्तरातील तथ्ये आणि आकडेवारीवरून असे स्पष्ट झाले आहे की, गोव्याने 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत केवळ 33 .344 मेगाव्हॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठले आहे.
देशासमोर असलेले 175 मेगाव्हॅट सौर व अक्षय उर्जेचे राष्ट्रीय एकत्रित लक्ष्य साध्य करण्यासाठी 358 मेगाव्हॅटचे लक्ष्य गाठणे गोव्यावर बंधनकारक होते. आता परत एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील दोन वर्षांत 500 नोकऱ्यांच्या निर्मीतीसह 150 मेगाव्हॅटचे नवे उद्दिष्ट ठेवले आहे, जे पूर्णपणे अवास्तव आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
सरकारने इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदान योजना बंद केली. हरित ऊर्जेबाबत ते गंभीर नसल्याचे या कृतीवरून दिसून येते. सरकारकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे असतील तर ते इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी का देऊ शकत नाही, असा सवाल युरी आलेमाव यांनी उपस्थित केला आहे.
गोव्याने 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत केवळ 33.344 मेगाव्हॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठले आहे. देशासमोर असलेले सौर व अक्षय उर्जेचे राष्ट्रीय एकत्रित लक्ष्य साध्य करण्यासाठी 358 मेगाव्हॅटचे लक्ष्य गाठणे गोव्याला बंधनकारक होते. आता परत एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील दोन वर्षांत 500 नोकऱ्यांच्या निर्मितीसह 150 मेगाव्हॅटचे नवे उद्दिष्ट ठेवले आहे, जे पूर्णपणे अवास्तव आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
...तर राज्याची विजेची गरज पूर्ण होईल
भाजप सरकारने विध्वंसक तामनार प्रकल्प सुलभ करण्यासाठीच सौर आणि अक्षय ऊर्जा निर्मितीवर वेळकाढू धोरण अवलंबले आहे. जर सरकारने या प्रकल्पाला लागणाऱ्या एकंदर निधीपैकी फक्त अर्धा निधी गोव्यात अक्षय ऊर्जा निर्मितीवर गुंतवला तर सौर व अक्षय उर्जेतून संपूर्ण गोव्यातील विजेची गरज पूर्ण करता येईल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
कार्यक्रमात मोठमोठ्या घोषणा करून प्रसिद्धी मिळविण्यात काहीच अर्थ नाही. राज्यात सौर आणि अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने कृतिआराखडा तयार करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.