

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी विक्रमी ७०.८१ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात ७२.६६, तर दक्षिण गोव्यात ६८.९३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान लाटंबार्सेत (८८.२९ टक्के), तर सर्वांत कमी मतदान नावेलीत (५५.२९ टक्के) झाले.
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २६६ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंदिस्त झाले असून, त्यांचे भवितव्य सोमवारी निकालानंतर ठरणार आहे. राज्यात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखली जाणारी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह काँग्रेस, ‘आप’च्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात उतरून जिल्हा पंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती.
त्याच्या प्रभावामुळे आणि राज्य निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांत केलेल्या जागृतीमुळे अधिकाधिक मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत लोकशाहीच्या उत्सवात भाग घेतला. त्यामुळेच विक्रमी ७०.८१ टक्के मतदानाची नोंद झाली. वाढीव मतदानामुळे मतदारांनी नेमक्या कोणत्या पक्षाला कौल दिला आहे, याचे उत्तर सोमवारीच मिळणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपई मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. हे दोन्ही नेते गेल्या काही दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळेच तेथील अधिकाधिक मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे शिवाय मतदानवाढीस राज्य सरकारची ‘माझे घर’ योजना महत्त्वपूर्ण ठरल्याचा अंदाजही बांधण्यात येत आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी-पाळी मतदान केंद्रावर कुटुंबीयांसह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुलक्षणा, वडील पांडुरंग सावंत आणि कन्या पार्थिवी होती. पार्थिवी हिने यंदा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
भाजपचे पश्चिम बंगालचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यातून गोव्यात दाखल होऊन पीर्ण येथे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान केले आणि त्यानंतर तत्काळ ते आपल्या कामाच्या ठिकाणी निघून गेले.
दक्षिणेत तीन जागी यश : सरदेसाई : मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच उतरलेल्या गोवा फॉरवर्डने ९ जागांवर उमेदवार उभे केले असून दक्षिण गोव्यात चारपैकी तीन उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. उत्तर गोव्यातही पाचपैकी दोन ठिकाणी आम्हाला विजय मिळू शकतो, असे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यात अखेरच्या क्षणी युती झाली. ही युती पूर्वीच झाली असती तर दाेन्ही पक्षांना आणखी फायदा झाला असता, असेही सरदेसाई म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याची तक्रार तोर्से येथील मतदार ज्ञानेश्वर वरक यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. सुर्ल येथील समाजसेवक प्रमोद नार्वेकर यांनीही ‘नोटा’ पर्याय उपलब्ध न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यंदाच्या मतपत्रिकेत ‘नोटा’ हा पर्यायच दिलेला नव्हता. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला मत न देण्याचा लोकशाही प्रणालीतील हक्क मतदारांना नाकारला गेला, असा आरोप केला आहे. याशिवाय, मतदानावेळी अधिकारी मतपत्रिकांचे क्रमांक नोंदवत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब गोपनीयतेचा भंग करणारी असून, हे निवडणूक नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मतदान केंद्रात मतदारांना निर्भयपणे व गोपनीय पद्धतीने मतदान करता येईल, अशी व्यवस्था केली नव्हती. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या कृतींमुळे मतदारांवर मानसिक दबाव निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.