

साखळी: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना सुर्ल -साखळी येथील मतदारांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (EVM) मशीनवर 'नोटा' (NOTA) हा पर्याय उपलब्ध असतो, मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीत बॅलेट पेपरवर हा पर्याय नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केलाय.
जर रिंगणातील एकही उमेदवार पसंत नसेल, तर मतदारांनी आपले मत कोणाला द्यावे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सुर्ल येथील प्रसिद्ध समाजसेवक प्रमोद नार्वेकर यांनी या संदर्भात मतदारांची बाजू मांडली. ते म्हणाले की, "लोकशाहीमध्ये मतदाराला आपला नापसंतीचा हक्क बजावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
विधानसभा आणि लोकसभेला 'नोटा'चा पर्याय दिला जातो, मग पंचायत किंवा जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये हा भेदभाव का? या निवडणुकांकडे दुर्लक्ष न करता, येथेही मतदारांना सर्व पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे." बॅलेट पेपरवर 'नोटा'चा शिक्का मारण्याची सोय नसल्याने अनेक मतदारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
मतदारांच्या मते, कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना मतदारांवर कोणा एकाला निवडण्याची सक्ती नसावी. जर उमेदवार योग्य वाटत नसतील, तर 'नोटा' हा पर्यायच लोकशाहीचे खरे स्वातंत्र्य दर्शवतो.
सुर्लतील ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, यापुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, त्यामध्ये 'नोटा'चा समावेश अनिवार्य असायला हवा, कारण असा पर्याय उपलब्ध असला तरच उपस्थित उमेदवारांना मतदारांनी का मत दिले नाही याचा विचार केला जाईल असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.