

पणजी : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या मंदावला असून ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
मान्सूनच्या सुरवातीलाच, म्हणजेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात तब्बल ४० टक्के पावसाची घट नोंदविण्यात आली आहे.
पावसाचा जोर कमी झाल्याने ऐन पावसाळ्यात गोमंतकीयांना कडक उन्हाचा आणि वाढत्या उष्म्याचा सामना करावा लागत आहे. मागील २४ तासांत राज्यात केवळ ०.६ मिमी पावसाची नोंद झाली असून फोंडा, साखळी आणि सांगे या भागांत तुरळक सरी कोसळल्या.
मान्सून आगमनानंतर आतापर्यंत राज्यात १५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, पावसातील या खंडामुळे शेतकरीवर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
३ अंशांनी वाढ
पावसाचा जोर घटल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. आज राज्यात कमाल ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान २८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. घराबाहेर पडल्यास घामाच्या धारा लागून अंगाची लाही-लाही होत आहे.
गोवा वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार असून काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रविवारी दक्षिण गोव्यात काही प्रमाणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना या दमट हवामानाचा आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. वाढता उष्मा आणि पावसाळी स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.