

पणजी : राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला असून असह्य उष्म्यामुळे घामाच्या धारा लागत आहेत आणि अंगाची लाही-लाही होत आहे. ऐन मार्च महिन्यात मे सदृश स्थिती निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यात कमाल ३५.४ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, जी यंदाच्या मार्चमधील सर्वाधिक तापमान आहे. पुढील दोन दिवस तापमान ३५ अंशांवर राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पट्ट्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम राज्यात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात दिसून येत आहे. दिवसभर कडक ऊन आणि ढगाळ वातावरण यामुळे नागरिकांना अधिक त्रास होत आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत ४.५ अंशांनी वाढ झाली तर उष्माघात मानला जातो. मात्र, आज राज्यात कमाल तापमानात ३.१ अंश सेल्सिअसने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर किमान तापमानातही २.२ अंशांनी वाढ झाली आहे. आज कमाल ८९ टक्के इतकी आर्द्रता नोंदविण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानात झालेली वाढ लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना उष्म्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.