

पणजी : राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये फाउंडेशन स्तरावर प्रवेश घेतलेले सुमारे २८ टक्के विद्यार्थी बारावीपर्यंत पोहोचत नसल्याचे शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या २०२५–२६ मधील ‘युडीआयएसई प्लस’ अहवालातून समोर आले आहे.
अहवालानुसार, २०२५–२६ मध्ये गोव्याचा शालेय प्रवेशापासून ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत टिकून राहण्याचा दर (रिटेन्शन रेट) ७१.७ टक्के इतका होता. यातून ७१.७ टक्के विद्यार्थी शालेय प्रवेशापासून ते उच्च माध्यमिकपर्यंत टिकून राहतात, तर सुमारे २८ टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे दिसून येते. शालेय प्रवेशापासून उच्च माध्यमिकपर्यंत ६५.५ टक्के मुले आणि ७८.४ टक्के मुली टिकून राहतात, असे अहवालात म्हटले आहे.
यातून बारावीपर्यंत पोहोचण्याआधीच शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, शालेय प्रवेशापासून उच्च माध्यमिकपर्यंत टिकून राहण्याचा राष्ट्रीय दर ५१.९ टक्के इतका आहे. त्या तुलनेत गोव्याचा ७१.७ टक्के दर समाधानकारक असल्याचेही अहवालातून दिसून येते.
१०० टक्के दर असलेला चंदीगड एकमेव
संपूर्ण देशात केवळ चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा रिटेन्शन रेट १०० टक्के असल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. त्यानंतर या यादीत केरळ (९०.१ टक्के), लक्षद्वीप (८५.५ टक्के), पुदुच्चेरी (८२ टक्के), दिल्ली (८०.४ टक्के), हरियाणा (७८.३ टक्के) आणि आंध्र प्रदेश (७८.१ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.