

पणजी: राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पोलिस यंत्रणेला कडक शब्दांत निर्देश दिले. काही महत्त्वाचे गुन्हे मुख्यमंत्र्यांपासून लपवण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावल्याचेही समजते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यानी नाकाबंदी वाढविणे, तपासात गती आणणे तसेच अलीकडील गंभीर गुन्ह्यांचे तपशीलवार विश्लेषण करून त्यांना तडीस नेण्यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास काही ठिकाणी झालेल्या बेफिकीरीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री बैठकीदरम्यान अस्वस्थ दिसत होते. काही गुन्ह्यांची माहिती वेळेत न देणे, काही गुन्ह्यांचे तपशील दडपणे आणि पोलिस यंत्रणेतील संवादात निर्माण झालेली दरी, या मुद्द्यांमुळे ते अधिकच संतप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात ‘कायद्याशी खेळ’ होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर गुरुवारी सकाळीच वरिष्ठ पोलिस अधिकारी सक्रिय झाले. सर्व पोलिसांना नवीन आदेश देत, नाकाबंदी ठिकाणी सतर्कता वाढवण्याचे निर्देश जारी करण्यात आले. तपासणीवेळी सर्व पैलूंचा विचार करणे, संशयास्पद वाहनांना थांबवणे, तसेच चौकशी प्रक्रिया एकसमान ठेवण्यावर भर दिला आहे.
नाकाबंदीत, गोवा नोंदणीकृत खासगी वाहनांकडे पोलिस दुर्लक्ष करतात, यामुळे गुन्हेगारांना गोवा नंबर प्लेटची गाडी सुरक्षित साधन ठरू शकते, असे काही अधिकाऱ्यांचेही निरीक्षण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.