
गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीचा विविध माध्यमातून जोरदार निषेध केला जात आहे. अनेक प्रकारच्या गैरधंद्यांत सहभागी असलेल्या दोषींवर त्वरित आणि निर्णायक दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
सुशासन आणि कायद्याच्या राज्यासाठी वचनबद्ध असलेल्या सरकारने आपल्या सर्व नागरिकांची, विशेषतः ज्यांना जबाबदार धरले जाते त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. अशाप्रकारे सर्वसामान्य माणसांवर होणारे हल्ले पाहता कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यावर वेळीच वचक बसणे गरजेचे आहे. अशा घटना म्हणजे जनतेच्या संयमाचा अंत आहे.
शांत आणि पर्यटनप्रिय राज्य अशी ओळख असलेल्या गोव्याला यावर्षी हिस्ट्रिशिटर्सच्या गुन्ह्यांनी हादरवून सोडले, असा दावा विरोधकांसहित सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
खून, हल्ले, लैंगिक छळ, खंडणी, गँगवार आणि घरफोडी अशा ११ गंभीर घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेषतः या घटनांमध्ये वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याची माहिती प्रसंगी पोलिसांनीदेखील उघड केली आहे.
पोलिसांनी या गुन्हेगारांविरोधात पावले उचलली आणि कारवाई करून अनेकांना अटकदेखील केली. काहींच्या ‘हिस्ट्री-शीट’ नव्याने उघडल्या, तर काही फरारी गुन्हेगारांना पेडणे, पर्वरी व बेळगावातून पकडण्यात आले.
राज्यभरात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान सुमारे ११ गंभीर घटना नोंदवण्यात आल्या. दरम्यान, किमान २९ हिस्ट्रिशिटर्स अशा गुन्हांमध्ये थेट सामील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
गोव्यातील हिस्ट्रिशिटर्स सतत सक्रिय आहेत, हे जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत घडलेल्या घटनांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असली तरी पुन्हा पुन्हा गुन्हे घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांवर अधिक प्रभावी नियंत्रणाची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
करंझाळे येथे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर काही हिस्ट्रिशीटर गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडे, राज्यात हल्ले किंवा मारहाणीचे प्रकार वाढल्याने तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी असतानाही अशा घटना घडत असल्याने कायदा व पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, याविषयी काही कायदेतज्ज्ञांना विचारले असता, त्यांच्या मते कायदा कमजोर नसतो. तर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न होणे हे मुख्य कारण आहे.
मुळात गोवा हा शांतिप्रिय प्रदेश. मात्र, अलीकडच्या काही घटनांमुळे येथील शांतता भंग झाली आहे किंबहुना राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचे दिसते. सध्या गॉडफादर किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे कायद्याच्या अंमलबजावणीत होणारी कसूर, तपासातील वादग्रस्त कारभार, वर्षांनुवर्षे चालणारे खटले, उलटणारे पंच किंवा फुटणारे साक्षीदार अशा गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचे मत सजग पोलिस व कायदे पंडितांकडून व्यक्त होत आहे.
याविषयी अॅड. महेश राणे यांनी सांगितले की, रामा काणकोणकरांवरील हल्ला हा निषेधार्ह आहे. या हल्ल्यामागे कोणीतरी गॉडफादर आहे. ही अदृश्य व्यक्ती अशा गुंडांना संरक्षण पुरवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.