

मडगाव: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कारस्थाने केल्यामुळेच काँग्रेस आणि आरजी यांच्यात युती होऊ शकली नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्षातच कित्येकजण या युतीच्या विरोधात होते. काँग्रेसचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सुरुवातीपासूनच या युतीला विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर आरजीशी युती केल्यास भविष्यात काँग्रेसला त्याचा कसा फटका बसू शकतो याची लेखी स्वरूपात कारणेही त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविलेल्या अहवालात दिली हाेती, अशी माहिती काँग्रेस पक्षातील खात्रीलायक गोटाकडून मिळाली आहे.
कॅ. फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात जी काय चर्चा झाली, ती पक्षांअंतर्गत बाब असून याबद्दल मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही असे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस आणि आरजी यांची राजकीय विचारसरणी परस्पर विरोधी असल्याने ही युती काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात जाऊ शकते हे माझे वैयक्तीक मत आमच्या बैठकीत मांडले होते, असे त्यांनी सांगितले.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता. आरजीने मते खाल्ल्याने किमान आठ ठिकाणी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी आरजी पक्षाला भाजपने राजकीय मैदानात उतरविले होते असा आरोपही करण्यात आला हाेता. याच पार्श्वभूमीवर आरजीबरोबर काँग्रेसने युती करावी की नाही यावर काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, आरजीबरोबर युती करण्यासाठी सर्वांत जास्त आग्रह जर कुणी धरला होता, तर तो विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता आणि हळदोणेचे आमदार कार्लुस आल्वारिस फेरेरा या तिघांनी. आरजी रिंगणात असल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा आपल्याला फटका बसू शकतो हे गृहितक या आग्रहामागे असावे असा तर्क व्यक्त केला जात आहे.
आरजी पक्षाशी काँग्रेसने युती करावी यासाठी मी आणि युरी आलेमाव यांनी आग्रह धरला ही गोष्ट पूर्णत: खरी आहे. मात्र, त्यामागे आमचा स्वत:चा कुठलाही स्वार्थ नव्हता. भाजपच्या विरोधात जी ६७ टक्के मते आहेत त्यांचे विघटीकरण होऊ नये यासाठी सर्व विराेधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाशी टक्कर द्यावी अशी लोकभावना गोव्यात तयार झाली होती. या लाेकभावनेला मान देण्यासाठीच ही युती व्हावी असा आग्रह आम्ही धरला होता.
- एल्टन डिकॉस्ता, आमदार, केपे
‘युतीविषयी काँग्रेसमध्ये होते दोन गट’
यासंदर्भात गिरीश चाेडणकर यांना विचारले असता आरजीबरोबर युती करण्याच्या विषयावर काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळ्या मतांचे गट होते हे त्यांनी मान्य केले. २०२२ मध्ये आरजीमुळे काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही हे त्यामागचे मुख्य कारण होते. त्याशिवाय आरजीची फक्त गोवेकर ही भूमिका काँग्रेसच्या सर्व समावेशकता धोरणाच्या विराेधात होती. अशी कारणे या संभाव्य युतीला आक्षेप घेताना पुढे आली होती, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.