
पणजी: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांसह पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (25 एप्रिल) पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी करण्यासोबत राज्यात राहत असलेल्या काश्मिरी नागिरकांना सुरक्षा देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला सरकारमधील मंत्र्यांसह पोलिस प्रमुखांनी हजेरी लावली. गोव्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले. याशिवाय, 17 पाकिस्तानी नागरिकांवर पोलिस लक्ष ठेवून असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तसेच, शनिवारपासून (26 एप्रिल) राज्यात पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. पर्यटन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यासोबत नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना सांगितले.
याशिवाय, राज्यात राहत असलेल्या परप्रांतियांची कडक तपासणी करण्यात आहे. आठवडी बाजाराच्या ठिकाणी येणाऱ्या परप्रांतियांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. तसेच, राज्यात राहत असलेल्या काश्मिरी नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.