
पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली असली, तरी १ जून ते १९ जुलै या मान्सून काळात गतवर्षी पडलेल्या पावसापेक्षा यंदाचा पाऊस ३४ इंचांनी कमी असल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
आत्तापर्यंत धारबांदोड्यात सर्वाधिक (९०.४४ इंच), तर मुरगावात सर्वात कमी (३८.३७ इंच) पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्य हवामान विभागाने येत्या २६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे.
गतवर्षी १ जून ते १९ जुलै या काळात राज्यात ९६.९७ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र या काळात केवळ ६२.७८ इंच पाऊस पडलेला आहे. यंदाचा पाऊस सरासरीच्या ०.४ टक्क्यांनी कमी असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत मात्र तो ३४ इंच कमी झाला आहे.
गोव्यासह देशभरात यंदाचा मान्सूनचा पाऊस समाधानकारक असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार देशातील इतर काही राज्यांमध्ये गतवर्षीपेक्षाही अधिक पाऊस पडलेला आहे. पण पावसाने यंदा गोव्याकडे पाठ फिरवली आहे.
राज्यात यंदा मान्सून निश्चित काळाआधीच दाखल झाला. त्याआधी मान्सूनपूर्व पावसाने राज्याला काही दिवस झोडपून काढले होते, परंतु मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली. मध्यंतरी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या पाच–सहा दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.
राज्यातील १४ केंद्रांपैकी ११ केंद्रांत पावसाने आत्तापर्यंत इंचाचे अर्धशतक पूर्ण केले आहे, तर तीन केंद्रांत ५० इंचांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षी आत्तापर्यंत सांगे, साखळी, फोंडा, काणकोण या चार केंद्रांत पावसाने इंचाचे शतक, तर इतर केंद्रांत अर्धशतक पूर्ण केले होते.
साळावली : ११६, अंजुणे : ७४, चापोली : ९८, पंचवाडी : १०१, गावणे : १००, आमठाणे : २, तिलारी : ८२
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.