
पणजी: राज्य विधानसभेचे १५ दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. काही प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपण्याचीही शक्यता आहे.
अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी मिळून ७८९ तारांकित आणि ३,३३० अतारांकित असे मिळून एकूण ४,११९ प्रश्न सादर केले आहेत. याशिवाय १६ सरकारी आणि १५ खासगी विधेयकेही अधिवेशनात सादर होणार आहेत.
यात कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर घरे कायदेशीर करणे, हिंस्र जातीच्या कुत्र्यांवर बंदी घालणे अशी महत्त्वपूर्ण विधेयके चर्चेला येणार आहेत. दरम्यान, गत अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ तीन दिवसांचे घेतले होते. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर केला होता.
सध्या विधानसभेत सत्ताधारी भाजपकडे ३३ आमदारांचे संख्याबळ आहे. तर, विरोधकांकडे केवळ सात आमदार आहेत. २०२२ नंतर झालेल्या अनेक अधिवेशनांमध्ये विरोधी सातही आमदारांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना विविध विषयांवर उघडे पाडले होते. मात्र, गेल्या महिन्यात घडलेल्या घटनांमधून विरोधकांमध्ये एकी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी आधीच आपण वेगळी चूल मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अधिवेशनासंदर्भात बोलावलेल्या विरोधी आमदारांच्या बैठकीला गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे सभागृहात ते काय भूमिका घेणार हे कळेल.
सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र पूर्णपणे एकी असल्यामुळे विस्कळीत झालेले विरोधक सभागृहात त्यांना कशा पद्धतीने धारेवर धरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.