
Goa bjp condolence meeting: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते दिवंगत रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याला उजाळा देत भावूकपणे आदरांजली वाहिली. रवी नाईक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली वाहताना रवी नाईक यांना आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले. डॉ. सावंत म्हणाले की, कूळ-मुंडकार हा विषय त्यांच्या काळजातील होता. राजकीय वारसा नसतानाही नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास त्यांनी केला, जो आजच्या युवकांसाठी मोठा आदर्श आहे.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे रवी नाईक हे लोकांचे नेते होते. ते चांगले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कधीच सूडीचे राजकारण केले नाही. त्यांनी कधीही कोणाला दुखावले नाही. आपल्या समाजासाठी काम करताना त्यांनी इतर समाजाच्या भल्यासाठीही काम केले. त्यांनी सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने व्यवहार केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक रवी नाईक केवळ भंडारी समाजाचे नेते नव्हते, ते समस्त बहुजन समाजाचे कैवारी होते. गोव्याच्या राजकीय इतिहासाच्या पानावर नाव नोंदलेल्या नेत्यांमध्ये रवी नाईक यांचेही नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. माजी केंद्रीय कायदेमंत्री रमाकांत खलप भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हेच बहुजन समाजाचे मोठे नेते ठरले. राजकीय जीवनात आम्ही एकत्र काम करत असताना माझे नाव पुढे असायचे, पण सेनापती मात्र रवीच असायचे. कोणत्याही विषयाबाबत रवी नाईक यांनी समाजात वाद होऊ दिला नाही.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की राज्याचे गृहमंत्री असताना रवी नाईक यांनी केलेले काम कुणीही विसरणार नाही. पोलिसांना मोकळीक देऊन रवी नाईक गुंडांचे कर्दनकाळ ठरले. सत्ता हाती असतानाही त्यांनी कधीच विरोधकांना विनाकारण गजाआड वगैरे केले नाही. वीजमंत्री सुदिन ढवळीकर भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर, रमाकांत खलप, प्रकाश वेळीप असे अनेक लोकनेते मगो पक्षाने तयार केले. नेतृत्व कसे असावे? लोकांना कसे संघटित करावे? हे रवी नाईक यांनी दाखवून दिले. रवी नाईक हे उत्तम प्रशासक होते.
मंत्री विश्वजीत राणे भावूक रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना मंत्री विश्वजीत राणे गहिवरले. आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचा जीव केवळ रवी नाईक यांच्यामुळेच वाचला असल्याची आठवण त्यांनी सांगितली. रवी नाईक यांनीच माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यावर विमानाने डॉक्टर आणण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ब्रह्मेशानंद स्वामी रवी नाईक यांनी ब्रह्मानंद स्वामींना दिलेला शब्द पाळत तपोभूमीची स्थापना केली. रवी नाईक देव-देव करत नव्हते, पण देव मानणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण करत होते.
दिवंगत रवी नाईक हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच अलीकडेच कृषिमंत्री म्हणून कार्यरत होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.