

यशवंत सावंत
पणजी : राज्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेवर गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीची काळी छाया अधिक गडद होत चालली आहे. विशेषतः ‘देशी कट्टा’सारख्या बेकायदेशीर शस्त्रांच्या वाढत्या वापरामुळे पोलिस यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
राज्याच्या सीमावर्ती भागांतून तसेच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातील काही भागांतून केवळ मजुरांचीच नव्हे, तर शस्त्रास्त्रांचीही तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिससूत्रांकडून समोर आली आहे.
पर्यटन आणि रोजगाराच्या निमित्ताने गोव्यात येणाऱ्या काही व्यक्तींच्या माध्यमातून ‘देशी कट्टा’ आणि इतर बेकायदेशीर शस्त्रे राज्यात दाखल होत असल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे. गुन्हेगारी टोळ्यांनी यासाठी स्वतंत्र आणि गुप्त पुरवठा साखळी उभारल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे गोव्यातील गुन्हेगारी विश्वात ‘डेथ पॅकेज’ ही संकल्पना वेगाने पाय रोवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काही वर्षांपूर्वी गोवा पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रे जमा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत तब्बल ३ हजारांहून अधिक शस्त्रे जमा झाली. मात्र त्यातील बहुतांश शस्त्रे जुनी, खराब किंवा वापरात नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. तरीही बाहेरून येणाऱ्या आधुनिक आणि जीवघेण्या शस्त्रांची आवक सुरूच असल्याने त्यांचा पुरवठा करणाऱ्या छुप्या मार्गांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
गोव्यात देशी कट्टा किंवा काडतूस सहज उपलब्ध होत नसले तरी गुन्हेगारांनी त्यासाठी स्वतंत्र जाळे निर्माण केले आहे. रोजगारासाठी गोव्यात येणाऱ्या काही मजुरांच्या माध्यमातून शस्त्रांची माहिती, संपर्क आणि पुरवठा साखळी कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.विशेषतः बेळगाव, दोडामार्ग, बांदा तसेच तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकाता परिसरातील काही भागांत अशा शस्त्रांचा सहज पुरवठा होत असल्याचे समजते. ही शस्त्रे गोव्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजले जातात. त्यामुळे बेकायदेशीर शस्त्रांचा हा व्यापार अधिक संघटित आणि धोकादायक बनत चालला आहे.
बाहेरून होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या तस्करीबरोबरच गोव्यातील घराघरांत पडून असलेल्या जुन्या बंदुकाही पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पूर्वी शेतीचे संरक्षण, वन्य प्राण्यांपासून बचाव किंवा शिकारीसाठी वापरली जाणारी अनेक शस्त्रे आजही काही घरांमध्ये जतन करून ठेवली गेली आहेत. काही प्रकरणांत परवाना एका बंदुकीचा असला तरी प्रत्यक्षात दोन ते चार बंदुका घरात ठेवण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. दुर्दैवाने, एखादा अपघात, गुन्हा किंवा आत्महत्येची घटना घडल्यावरच अशा शस्त्रांचा उलगडा होतो.
गोवा पोलिसांनी एक वर्षापूर्वी राज्यभर अवैध आणि अनुपयोगी शस्त्रे जमा करण्यासाठी विशेष ‘सरेंडर मोहीम’ राबवली होती. या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३ हजारांहून अधिक शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात आली. विशेष म्हणजे, त्यातील जवळपास ८० टक्के शस्त्रे जुनी, खराब किंवा वापरासाठी अयोग्य होती. काही शस्त्रे तर १८व्या आणि १९व्या शतकातील दुर्मीळ नमुने असल्याचे आढळून आले. सध्या ती ऐतिहासिक वस्तू, प्रदर्शनासाठीच उपयुक्त असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यातील अनेक घरांमध्ये अजूनही जुन्या शिकारीच्या बंदुका आणि इतर शस्त्रे पडून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांकडे वैध परवाना असला तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक शस्त्रे बाळगली जात असल्याचे काही प्रकरणांत उघड झाले आहे. अशा शस्त्रांचा वापर अपघात, आत्महत्या किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये झाल्यानंतरच त्यांचा मागोवा लागतो. म्हापसा येथील घटनेने हा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. अशा छुप्या शस्त्रसाठ्यांविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
म्हापसा प्रकरणाने वास्तव उघड : नुकत्याच म्हापसा येथे घडलेल्या एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणाने ‘देशी कट्टा’ गोव्यात किती सहज उपलब्ध होत आहे, याची गंभीर जाणीव करून दिली.शवविच्छेदन अहवालानुसार, डोक्याच्या उजव्या बाजूने झाडलेली गोळी डाव्या बाजूला अडकून राहिल्याचे निष्पन्न झाले. यावरून वापरण्यात आलेले शस्त्र किती घातक होते, हे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर बेकायदेशीर शस्त्रांच्या प्रश्नाकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे.
‘डेथ पॅकेज’ म्हणजे नेमके काय? गोव्यात सहज उपलब्ध नसलेली बेकायदेशीर शस्त्रे राज्यात पोहोचवण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांनी स्वतंत्र पुरवठा साखळी उभारली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता आणि बेळगावसारख्या भागांतून कामासाठी येणाऱ्या काही व्यक्तींचा ‘कुरियर’ म्हणून वापर केला जातो. शस्त्रे सामानामध्ये लपवून गोव्यात आणली जातात. या धोकादायक कामासाठी संबंधितांना मोठा मोबदला दिला जातो. गुन्हेगारी जगतात या व्यवहाराला ‘डेथ पॅकेज’ असे संबोधले जाते.
गुन्हेगारीच्या नव्या वाटा
लहान-मोठ्या गुन्ह्यांत अटक होऊन तुरुंगात गेलेल्या काही आरोपींचा संपर्क तेथे सराईत गुन्हेगारांशी येतो. या काळात त्यांना शस्त्रास्त्रे मिळविण्याचे मार्ग, पुरवठा साखळी आणि गुन्हेगारीचे विविध डावपेच शिकवले जातात. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर याच व्यक्ती बेकायदेशीर शस्त्रांच्या व्यवहारात सक्रिय होतात आणि स्थानिक गुन्हेगारीला चालना मिळते, अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.