
तिसवाडी: गोव्याच्या जलवाहतुकीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. देशातील पहिल्या-वाहिल्या रो-रो फेरीचे उद्घाटन सोमवार (१४ जुलै) रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे समाज कल्याण आणि नदी नेव्हिगेशन मंत्री सुभाष फळदेसाई आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे देखील उपस्थित होते. गोव्याला हा ऐतिहासिक बहुमान मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
राज्यातील जलमार्गात अत्याधुनिकता आणणारी ही सेवा असल्याने, तिच्या शुभारंभ कार्यक्रमाची अनेकांना उत्सुकता लागली होती. हा कार्यक्रम यापूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आला होता. अखेर सोमवारी हा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर, रायबंदर-चोडण जलमार्गावर ही रो-रो सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, गोवा सरकार केवळ रस्ते आणि बांधकाम विभागातच नव्हे, तर इतर क्षेत्रांमध्येही विकासकामे घडवून आणत आहे. लोकांना अधिकाधिक सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात सध्या आणखी आठ ठिकाणी फेरी सेवा कार्यरत आहे आणि आगामी काळात त्यांचेही रो-रो फेरीत रूपांतर केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.
चोडण-रायबंदर रो-रो फेरीबोटीचे दर सरकारने निश्चित केले असून, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासी आणि दुचाकी वाहनांना मोफत प्रवास उपलब्ध असेल, तर चारचाकी वाहनांसाठी केवळ ३० रुपये शुल्क आकारले जाईल.
नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पास सिस्टिमद्वारे ५० टक्के सवलत दिली जाईल, असेही सरकारने जाहीर केले आहे. यामुळे प्रवासाची सोय तर होणारच, पण वेळ आणि इंधनाचीही बचत होईल अशी अपेक्षा आहे. या रो-रो सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यावरणालाही फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.