
मडगाव: गोव्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आणीबाणीवरुन इंदिरा गांधी यांच्यासह राहुल यांच्यावर देखील टीका केली आहे. हातात संविधान घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधी यांना आणीबाणीच्या काळात संविधान खऱ्या अर्थाने धोक्यात होते हे सांगायला हवं, असे कामत म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला.
भाजपच्या वतीने मडगाव येथे संविधान हत्या दिवस (२५ जून) साजरा करण्यात आला, यावेळी दिगंबर कामत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंतही उपस्थित होते.
“देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यावेळी मी २१ वर्षाचा होतो. या काळात देशातील न्यायालय, माध्यमांवर दबाव टाकला जात होता, वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जात होता, अनेकांना कारागृहात टाकण्यात आले, हे सर्व केवळ तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाचविण्यासाठी सुरु होते. देशात त्यावेळी संविधान अस्तित्वातच नव्हते,” असे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले.
“आता इंदिरांचे नातू (राहुल गांधी) हातात संविधानाची प्रत घेऊन संविधान धोक्यात असल्याचे सांगत गावोगावी फिरतायेत. देशात आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा संविधान धोक्यात होते, हे त्यांना सांगायला हवं. पण, १९७७ साली भारतीय नागरिकांना जगाला दाखवून दिले की आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असे कामत म्हणाले. विधिमंडळ (कायदेमंडळ), कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे महत्वाचे चार स्तंभ आहेत, असेही कामत यांनी यावेळी नमूद केले.
"आणीबाणीच्या काळात सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक केली जात होती, देशभरात लाखो जणांना अटक करण्यात आली. गोव्यात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या वडिलांनी अटक करण्यात आली प्रभाकर सिनारी अटकेत होते, स्वातंत्र्य सैनिकांनी देखील सोडले नाही. आणीबाणीच्या विरोधात सर्वात मोठा विरोध मडगावात झाला होता," असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
"ब्रिटीशांनी देखील केले नाही अशी नसबंदी मोहीम देशात राबविण्यात आली. लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली अशी कामे करण्यात आली, यात अनेकांच्या पिढ्या पुढे वाढल्याच नाहीत. मी जनता पार्टीची दुसरी पिढी आहे," असे सावंत म्हणाले.
"१९७८ मध्ये जनता पार्टीने गोव्यात चार जागा लढवल्या होत्या. मडगाव, पणजी, वास्को आणि पाळये येथे जनता पक्षाचे उमेदवार होते. पाळीये जागा माझ्या वडिलांनी लढवली होती. आणीबाणीत लढा दिल्यानंतर त्यांना निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांना केवळ ४०० मते पडली व त्यांचा पराभव झाला. पण, त्यानंतर ४० वर्षे लोकांना माझ्या वडिलांना जनता पार्टीचे म्हणून लोकांनी हिणवले, मी आमदार झाल्यानंतर ते बंद झाले," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.